२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच मनपाने पाणीपट्टीत वाढ करून नगरकरांना ऐतिहासीक दणका दिला आहे. अहिल्यानगर मनपाच्या स्थापनेला २२ वर्षे झाली असून २२ वर्षांनंतर पाणीपट्टीमध्ये ९०० ते ४००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांना आता घरगुती वापरासाठी आता २४०० रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे.
याच बरोबर दर वर्षी दोनशे रुपयांची वाढ केली जाणार आहे.तसा ठराव देखील महासभेत करण्यात आला.दरम्यान पाणीपट्टी वाढीला सुरुवातीपासूनच माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला होता.मात्र तरी देखील आयुक्त यशवंत डांगे यांनी पाणीपट्टीत वाढ केली.

पाणीपट्टीत झालेली ही दरवाढ २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात एक एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे.त्यामुळे नळ धारकांना यापुढे अर्धा इंचीसाठी २४००, पाऊण इंचीसाठी ४८००, तर एक इंचीसाठी १० हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे.अहिल्यानगर महापालिका स्थापन झाल्यानंतर शहरात घरगुती वापराच्या अर्धा इंची नळ कनेक्शनसाठी पूर्वीच्या असलेल्या दरात ८०६ रुपये वाढ करून १५०० रुपये पाणीपट्टी निश्चित करण्यात आली.
त्यानंतर घरघुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ झाली नाही. मात्र, त्यानंतर २०१६ मध्ये केवळ व्यावसायिक व औद्योगिक वापराच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर घरघुती पाणीपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव २०१८ पासून सातत्याने फेटाळण्यात आला. प्रशासनाने पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती, महासभेत मांडल्यानंतर तो पदाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला.
त्यामुळे गेल्या २२ वर्षांत पाणीपट्टीच्या करात वाढ झाली नाही. दरम्यान, प्रशासक नियुक्ती नंतरही लोकसभा, विधानसभा अशा निवडणुका असल्याने हा विषय टाळण्यात आला. पाणीपट्टीत वाढ नसली तरी पाणी पुरवठा योजनेसह वितरण व्यवस्थेवर होणार खर्च वर्षाकाठी सुमारे ४० कोटींवर पोहचला आहे.त्यामुळे महिन्याकाठी वसुली आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासन मेटाकुटीला येत होते.
त्यामुळे आयुक्त डांगे यांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थायी समितीने घरगुती पाणीपट्टीत दुपटीने वाढ सुचवली. त्याला लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांनी विरोध दर्शविला. त्यांचा विरोध लक्षात घेता प्रशासक डांगे यांनी ३००० ऐवजी २४०० रूपये दर निश्चित केला आहे.