Mumbai New Railway Line : भारतात बस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशात रेल्वेचे एक मोठे नेटवर्क कार्यान्वित आहे आणि यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात प्रवास करायचं म्हटलं की सर्वप्रथम रेल्वेचे नाव ओठावर येते. रेल्वेने देशातील कोणत्याही भागात पोहोचता येते.
महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो आणि यामुळे अनेकजण रेल्वेलाच प्राधान्य देतात. दरम्यान सरकारकडून रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी वेगवेगळे रेल्वे मार्ग तयार केले जातात. अशातच आता महाराष्ट्राला आणखी एक नवा रेल्वे मार्ग मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते इंदोर दरम्यान हा नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार असून या रेल्वे मार्गाला सप्टेंबर 2024 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या रेल्वे मार्गाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार रूट ?
इंदोर मुंबई रेल्वे मार्ग प्रकल्प 309 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पामुळे 1,000 गावांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 18 हजार 36 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग महाराष्ट्रातील मुंबई सहित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे या जिल्ह्यांमधुन जाणार आहे. यासोबतच हा मार्ग मध्य प्रदेशातील बरवानी, खरगोन, धार आणि इंदूर या जिल्ह्यांमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.
या मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सहा जिल्हे जोडले जाणार आहेत. या मार्गावर 30 नवीन रेल्वे स्टेशन विकसित होणार आहेत. यामुळे मुंबई ते इंदोर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर इंदूरमधील जनतेला जलद गतीने मुंबईत दाखल होता येईल.
याचा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे या जिल्ह्यातील नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प नाशिक, धुळे या जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. मुंबई इंदोर रेल्वे प्रकल्पामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवासाचा कालावधी कमी होईल.
हा प्रकल्प कृषी, पर्यटन, उद्योग, शिक्षण अन अध्यात्म क्षेत्रासाठी फायद्याचा ठरेल. मुंबईहून उज्जैन ला जाणाऱ्या नागरिकांना देखील या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. त्यामुळे इंदोरसहित उज्जैन व आजूबाजूच्या परिसरातील विकासाला गती मिळणार आहे.