देशभरातील प्रमुख २१ तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी वाढत आहे, मात्र शिर्डीत अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शिर्डीतील व्यावसायिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी चिंतन बैठक घेतली.
या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, साईबाबांविषयी चालू असलेल्या अपप्रचाराचा परिणाम शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शिर्डीला पर्यटन स्थळ म्हणून नव्हे, तर धार्मिक तीर्थस्थान म्हणून विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शिर्डीत भाविकांना आकर्षित करण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. पुढील २४ दिवसांत प्राथमिक आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थान, नगर परिषद, प्रशासन, ग्रामस्थ, राज्य आणि केंद्र सरकार, साईभक्त, तसेच देशभरातील साई मंदिरे यांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे, असे बैठकीत ठरले.
यासाठी स्वतंत्र कार्यालय, वेबसाइट, घोषवाक्य, डिजिटल प्रचार मोहीम आणि वॉर रूम तयार करण्याची योजना आखली गेली आहे. सुरेश चव्हाणके यांच्या ट्रस्टतर्फे या उपक्रमांसाठी २१ लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले.
शिर्डीत भाविकांची संख्या वाढवण्यासाठी संघटीत प्रयत्न, साईबाबांविषयी सकारात्मक प्रचार, उत्तम दळणवळण व्यवस्था आणि व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक आहे. शिर्डीला पुन्हा तीर्थक्षेत्र म्हणून भक्तीचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी स्थानिक नागरिक, प्रशासन आणि धार्मिक संस्थांना एकत्र येण्याची गरज आहे.