कर्जत मधील रूईगव्हाण पीर फाटा परिसरामध्ये सीना धरणाकडे जाणारा कुकडीचा मुख्य कालव्याचा भराव तोडून त्यात मोठमोठे पाईप टाकून काही जणांनी फोडला. त्यामुळे सीना धरणामध्ये पाणी जाण्यास अडचण निर्माण होणार असून, भराव फोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यातील पाण्यामध्ये उतरून अर्ध नग्न आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
अमोल खराडे, विकास शिरसागर, विकास खराडे, उत्तम क्षीरसागर, बलभीम खराडे, परमेश्वर क्षीरसागर, रावसाहेब खराडे, नितीन शिरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी या वेळी उपस्थित होते. कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुटले आहे, या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना मोठा फायदा होणार आहे.

तसेच ज्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. असे असताना तालुक्यातील रुईगव्हाण पीर फाटा परिसरामध्ये कुकडीच्या मुख्य कालव्यामधून सीना धरणामध्ये पाणी जाण्यासाठी कालवा तयार करून भोसा खिंडीमधून धरणामध्ये पाणी नेण्यात आले आहे. त्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. सीना धरणाकडे जाणाऱ्या कालव्याला काही नागरिकांनी भराव फोडून त्यामध्ये मोठे पाईप टाकून राजरोसपणे कालव्याच्या पाण्याची चोरी केली आहे.
हे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी छोट्या तलावामध्ये सोडल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात या तलावामधून मोठ्या प्रमाणामध्ये शेती पंप बसवून त्याद्वारे पाईपलाईनने आपल्या शेतामध्ये अनेकांनी पाणी घेऊन गेले आहेत. एवढेच नव्हे तर या मेन कालव्याच्या काही भागांमध्ये दगडाचा भराव टाकून पाणी देखील अडवले आहे. त्यामुळे या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खेचले जात आहे. मात्र, त्यामुळे भोसा गावातील शेतकरी संकटात सापडले आहे. या गावातील शेतकऱ्यांचे पूर्ण पाणी बंद झाले आहे. तसेच सीना धरणामध्ये जाणाऱ्या पाण्यात देखील मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळी सीना धरणामध्ये किती पाणी जाईल याविषयी शंका निर्माण झाली आहे.
मुख्य कालव्याचा भराव राजरोसपणे फोडला व पाईप टाकून चोरी करत असल्याचे स्पष्टपणे दिसत असताना व माहिती असताना देखील पाटबंधारे कुकडी विभागाचे अधिकारी व कर्मचारी संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई करत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे. संतप्त झालेल्या भोसा गावातील सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी हा भराव फोडला आहे आणि पाईप टाकून पाणीचोरी सुरू आहे, त्या परिसरामध्ये पाण्यामध्ये उतरून अर्धनग्र आंदोलन केले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कुकडी विभागाची अधिकारी हा सर्व प्रकार माहित असून देखील संबंधित नागरिकांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न विकास क्षीरसागर यांनी उपस्थित केला. तसेच या प्रश्नावर कुकडी कार्यालयात जाऊन कारवाईसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा अमोल खराडे यांनी दिला आहे.