जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपत आल्याने या घटनांची भीती अधिकच वाढली आहे.
१५ वर्षीय मुलीचे अपहरण!
१३ मार्च रोजी नगर तालुक्यातील वाळकी गाव परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने अमिष दाखवून तिला फसवले आणि पळवून नेले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेच्या वेळी घरातून बेपत्ता
अपहरण झालेली मुलगी १२ मार्चच्या रात्री आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेली होती. मात्र, १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ती अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संपूर्ण परिसर तसेच ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, पण ती कुठेही सापडली नाही. अखेर मुलीच्या आईने नगर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल!
तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहेत. सदर प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.
वाढत्या अपहरणाच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण!
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी अनोळखी व्यक्तींशी सावधगिरी बाळगावी आणि पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे.