अहिल्यानगर : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी जिवंत असूनही ग्रामपंचायतीच्या ठरावात ग्रामसेवक व सरपंचानी मृत दाखवण्याचा प्रताप करण्यात आला.ही घटना जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथे घडली आहे.
या संदर्भात लाभार्थीच्या वारसदार मुलाने याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. या संदर्भात लेखी तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे केली आहे.
मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथील भुजंग माणिक जायभाय यांचे नाव २०२४ ते २०२५ या वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले होते. परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने सदर लाभार्थी हयात असताना मृत असल्याचे २९ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेच्या ठरावात दाखवले. त्यांना वारसदार देखील नाही, असे ठरावात नमूद केले. परंतु लाभार्थी भुजंग माणिक जायभाय हे सध्या हयात आहेत. त्यांना दोन मुले व तीन मुली आहेत. असे असताना ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने मनमानी कारभार करून या योजनेतून लाभार्थ्यांला वंचित ठेवले. तरी या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा वारसदार मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, विधानपरिषदेचे सभापती नामदार प्रा.राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार रोहित पवार यांना पाठवल्या आहेत.
