संगमनेर तालुक्यात या शुभ मुहूर्तावर होणार फक्त एक रुपयात विवाह, लग्न झालेल्या जोडप्यांना भेटणार खास गिफ्ट!

Published on -

संगमनेर: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाने रविवारी संगमनेरात एक खास सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय. खरं सांगायचं तर, हा विवाह अवघ्या एका रुपयात होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्वधर्मीय जोडपी एकाच मांडवात लग्नबंधनात अडकणार आहेत.

या सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना जवळपास २५ हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून मिळणार आहेत. १५ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येईल, असं मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी सांगितलं.

गेल्या २८ वर्षांपासून हा उपक्रम मालपाणी समूह संगमनेर तालुक्यातल्या नागरिकांसाठी आणि आपल्या कामगारांसाठी राबवत आहे. संगमनेरात काही भागात पाऊस कमी पडतो, शेतीवर अवलंबून राहणं कठीण होतं.

अशा परिस्थितीत लग्नाचा अनावश्यक खर्च टाळावा म्हणून हा सामुदायिक विवाह सोहळा सुरू झाला. वेगवेगळ्या जाती-धर्माच्या प्रथा-परंपरांचा विचार करून सगळी व्यवस्था केली जाते.

वधू-वरांसाठी स्वतंत्र कक्ष, पाहुण्यांसाठी बसण्याची सोय, शाही थाटात सजलेला विवाह मंडप, शेकडो लोकांसाठी एकाच वेळी जेवणाची व्यवस्था आणि वाजत-गाजत निघणारी वरांची मिरवणूक – हे सगळं पाहून डोळे दिपतात.

१९९७ मध्ये दिवंगत उद्योगपती ओंकारनाथ आणि माधवलाल मालपाणी यांनी या सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाची सुरुवात केली. गेल्या २८ वर्षांत मालपाणी कुटुंबाच्या दानशूरपणामुळे साडेसहाशे जोडप्यांचे त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार विवाह पार पडले आहेत.

हा सोहळा खास बनवण्यासाठी वधूचं वय किमान १८ आणि वराचं वय २१ असल्याचे कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे. नोंदणी फक्त एका रुपयात होते. वराला लग्नाचा पेहराव, फेटा, उपरणं आणि वधूला साडी, ओढणी, मुंडावळ्या मालपाणी समूहाकडून मिळतात.

याशिवाय प्रत्येक जोडप्याला स्टीलचं कपाट, पलंग, गादी, भांडी अशा २५ हजार रुपयांच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जाणार आहेत.

नोंदणीसाठी राहुल शेरमाळे किंवा स्वींद्र कानडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe