अहिल्यानगर : अरणगांव, ता. नगर हद्दीमधून गेलेल्या चारपदरी रिंगरोडची पूरक कामे मार्गी लाऊन अरणगांव व परिसरातील रहिवासी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या दैनंदिन दळणवळणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात तसेच वेळप्रसंगी होणारे अपघात टाळावेत अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन केली.
याच पूरक कामांसंदर्भात आपण दि.२२ जुलै रोजी आपणास पत्र दिल्याचे स्मरण करून देत खा. लंके म्हणाले, सोनेवाडी चौक ते अरणगांव चौकापर्यंतचे दक्षिण बाजूच्या सर्विस रोडचे काम प्रगतीपथावर असले तरी नाटमळा जंक्शन येथे पूर्व व पश्चिम बाजूला अंदाजे १ कि. मी. अंतरामध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूने रस्त्यासाठी संपादीत केलेल्या जागेवर सर्व्हिस रोडचे काम करण्यात आले नसून सर्विस रोड मुख्य रस्त्यात मर्ज करण्यात आल्याचे खा. लंके म्हणाले.

सर्विस रोड ज्या ठिकाणी करण्यात आलेला नाही तिथे चौक असून अपघाती क्षेत्र आहे. या ठिकाणी वाहनांना यु टर्न घेण्यासाठी व रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था ठेवण्यात आल्याने त्या चौकात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला जास्त जागा असणे आवष्यक आहे. जेणेकरून यु टर्न घेताना अपघात होणार नाहीत तसेच सर्विस रोडने येणारी वाहने चौकामध्ये मुख्य रस्त्यावर येत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नाटमळा चौकातील अपूर्ण सर्विस रोडचे काम पुर्ण करणे आवष्यक असल्याचे खा. लंके यावेळी म्हणाले.
नाटमळा जंक्शन येथे मोठी लोकवस्ती असून चौकातून उत्तर बाजूला मेहरबाबा समाधीकडे व भक्तनिवासाकडे जाणारा मार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणावर वाहतूक असल्याने रस्ता ओलांडताना आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्ता रोको, धरणे व उपोषण यांसारखी आंदोलनेही झाली आहेत. या ठिकाणी अपघाती क्षेत्र असल्याने बॉक्स टनेलची मागणी आहे. या चौकात स्पीड ब्रेकरची व्यवस्था करण्याचीही आवष्यकता असल्याचे लंके म्हणाले.
रिंगरोडच्या उत्तर बाजूने नाटमळा चौक ते अरणगांव येथील रेल्वे ब्रीज या भागात नागरी वस्ती मोठया प्रमाणावर वाढत असल्याने दैनंदिन दळवणळणासाठी सर्विस रोडची आवष्यकता आहे. जेणेकरून रिंगरोडच्या उत्तर बाजूला असलेल्या मेहेरबाबा वसाहतीमधील रहिवासी तसेच अरणगांव मधील वाढलेली लोकवस्ती येथील रहिवासी यांना अरणगांव तसेच अहिल्यानगर शहराचे दळवणवळण सुलभ होणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
दौंड रस्त्यासाठी फ्लायओव्हर ब्रिज हवा
दौंड-अहिल्यानगर या रस्त्यावरून दौंडकडून येणाऱ्या वाहनांना रिंगरोडवर प्रवेश करण्यासाठी दौंड चौकात व्यवस्था नसल्याने मेंडका नदीच्या दक्षिण तिरापासून पर्यायी फलायओव्हरची व्यवस्था करून सदरचा पुल रेल्वे ब्रिज ते दौंड चौक अरणगांव या भागात रिंग रोडला संलग्न करण्याची मागणी खा. लंके यांनी यावेळी केली.
उंच भरावावर सुरक्षेच्या उपाययोजना करा
रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूंचे भराव व दौंड चौकातील पश्चिम बाजूचा भराव हा उंच असल्याने त्या ठिकाणी सिमेंट ब्लॉक पिचिंग केली नसल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पिचिंग करणे किंवा लोखंडी जाळी लावणे यासारख्या उपाययोजना करण्याची मागणी खा. लंके यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली.