Ahilyanagar News : जिल्हा रुग्णालयात झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनांबाबत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे असून, पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण विखे पाटील कुटुंब ठामपणे उभे आहे आणि त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर
राहाता येथील वीरभद्र यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या टीकेला उत्तर दिले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणे हे काही नवीन नाही, अशा प्रकारचे आरोप यापूर्वीही अनेकांनी केले आहेत, पण त्याचा जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, “कोणी काहीही बोलेल, पण आमचं काम जनतेच्या हितासाठी चालूच राहणार आहे.”

जनतेचा विश्वास हीच खरी ताकद
विखे पाटील कुटुंबावर वेळोवेळी आरोप झाले, टीका झाली, पण तरीही मतदारांनी सातत्याने विश्वास दाखवला, हेच आमच्या कार्याचं मूल्यमापन असल्याचं डॉ. विखे यांनी स्पष्ट केलं. “गोरगरिब, गरजू आणि सामान्य माणसांसाठी विखे पाटील कुटुंब सतत कार्यरत राहिलं आहे आणि ही सेवा भावनेनेच सुरु राहील,” असं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
बच्चू कडूंना दिलं शांततेचं संदेश
बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “त्यांना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवो, अशीच मी प्रार्थना करतो.” त्यांनी इतर नेत्यांनी वापरलेल्या भाषेबाबत कोणतीही आक्रमक भूमिका न घेता संयमित उत्तर दिलं.