Ahilyanagar Politics : अजित पवारांच्या मनात आहे तरी काय ? अहिल्यानगरमध्ये येत म्हणाले MIDC कोणी आणली

अजित पवार यांनी समाजाला वाद टाळण्याचा आणि विकासाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला. “वाद घालून कुणाचे भले झाले नाही. जो माणूस योग्य दिशेने काम करतो, त्याच्या मागे उभा राहा. मी कुणावर टीका करत नाही. जनतेने आणि माझ्या लाडक्या बहिणीने माझे काम पाहिले आहे,” असे ते म्हणाले. तसेच, मतदारसंघातील कामांवर आपले बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. “बारामतीतील इमारती उगाच भव्य नाहीत. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते,” असे त्यांनी ठणकावले.

Published on -

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात स्थानिक आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “रोहित माझ्यासोबत असताना मी कर्जत-जामखेडसाठी किती कोटींचा निधी दिला, याची माहिती घ्या.

बरेच जण म्हणाले MIDC आणणार, पण ती आली का?” असा खोचक सवाल करत अजित पवार यांनी रोहित पवारांना टोला लगावला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी विकासकामांवर भाष्य करताना अहिल्यानगरच्या कारखान्यांच्या दुरवस्थेवरही बोट ठेवले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधीची हमी दिली.

अण्णासाहेब शेलारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जामखेड येथील एका कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. शेलार यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार यांच्या पक्षाला बळ मिळण्याची शक्यता आहे.

रोहित पवारांवर खोचक टीका

ह्यावेळी बोलताना अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. “रोहित माझ्यासोबत असताना कर्जत-जामखेडसाठी मी किती कोटींचा निधी दिला, याची माहिती घ्या. अनेकांनी MIDC आणण्याची घोषणा केली, पण ती आली का? आता MIDC आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील,” असे ते म्हणाले. या टोल्यामुळे अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील राजकीय तणाव पुन्हा एकदा समोर आला. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार शरद पवार गटात राहिले, तर अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची टीका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

अहिल्यानगरच्या कारखान्यांची दुरवस्था

अहिल्यानगरमधील कारखाने, जिल्हा बँक आणि सहकारी संस्थांच्या दुरवस्थेवरही अजित पवार यांनी भाष्य केले. “अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे? मी नावे घेणार नाही, नाहीतर काही जण फोन करून विचारतील, जामखेडच्या भाषणात आमच्या कारखान्याचा उल्लेख का केला? पण जनतेने या संस्थांकडे लक्ष द्यावे. अनेक संस्थांची परिस्थिती वाईट झाली आहे,” असे ते म्हणाले. बारामतीच्या विकासाचा दाखला देत ते पुढे म्हणाले, “बारामतीचा विकास उगाच झाला नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते.”

रखडलेल्या रस्त्यांसाठी गडकरींशी चर्चा

जामखेडमधील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांबाबतही अजित पवार यांनी आश्वासन दिले. “रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी मी वेळप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलेन. रस्त्यांसाठी काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. काहींची घरे काढावी लागली, तरी मी लोकांशी वाईटपणा घेतला,” असे त्यांनी सांगितले. या वक्तव्यातून त्यांनी विकासकामांसाठी आपली कटिबद्धता दर्शवली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची घोषणा

अजित पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. “अर्थमंत्री म्हणून मी खात्री देतो, या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. काम अत्यंत चोखपणे करावे लागेल,” असे ते म्हणाले. या घोषणेने स्थानिकांमध्ये उत्साह संचारला आहे, कारण अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा अहिल्यानगरसाठी अभिमानाचा विषय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe