Explained : तनपुरेंचा विजय म्हणजे विखेंचा बदला ? जाणून घ्या पडद्यामागचं राजकारण!

Published on -

Explained : विखे व थोरात या दोन्ही नेत्यांच्या साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा सुरु झाली ती, राहुरीच्या डाँ. तनपुरे साखर कारखान्याची… गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेला हा साखर कारखाना सभासदांचाच रहावा, यासाठी तेथील स्थानिक नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर या कारखान्याची निवडणूक लागली व त्यात अभूतपुर्व तीन पॅनल उभे राहीले. या निवडणुकीचा रविवारी निकाल लागला, आणि निकालानंतर राहुरी तालुक्याचे राजकारण बदलल्याच्या चर्चा सुरु झाल्या. विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले व माजी खासदार सुजय विखे हे या निवडणुकीतून अलिप्त राहिले. परंतु, निकालानंतर या दोघांच्याही चर्चा सुरु झाल्या. नेमकं काय बदललीत राजकारणाची समिकरणे? सुजय विखेंच्या चर्चा का सुरु झाल्या? ज्याच्यासाठी हा अट्टाहास झाला, तो कारखाना सुरु होईल का? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

मला व माझ्या कुटुंबाला ज्यांनी त्रास दिला, त्या सर्वांचा हिशोब मी व्याजासह चुकता करणार, असं सुजय विखे वारंवार सांगतात. गेल्या सहा-सात महिन्यांपासूनचे त्यांचे कोणतेही भाषण ऐकले पाहिले तरी, निवडणूक, विरोधक, त्रास, बदला… हे कायम ऐकायला येतं. संगमनेर, पारनेर किंवा थेट कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची हिच खु्न्नस जास्त चर्चेत आली. आता राहुरी कारखाना निवडणुकीनंतरही विखेंचा बदला पूर्ण अशा आशयाच्या बातम्या अनेक मीडियात ऐकायला मिळाल्या. खरंच विखेंनी त्यांचा बदला पूर्ण केला का? या प्रश्नाचं उत्तर आपण अगोदर पाहू.

प्रवरेच्या विखेंचं राजकारण ज्यांना माहित आहे, त्या जुन्या लोकांना विखेंची स्टॅटर्जी माहित आहे. नगर जिल्ह्यात असे एकही गाव नाही, जिथं विखे गट नाही. विखेंनाच पक्ष मानणारे, कित्येक सच्चे कार्यकर्ते नगर जिल्ह्यातील गावागावात गेल्या तीन पिढ्यांपासून आहेत. एखाद्याला जिंकून आणण्याची तर आहेच, पण एखाद्याला पाडण्याची ताकदही या गटात आहे. 1991 ची नगर दक्षिण लोकसभा निवडणूक पहा, किंवा अगदी अलिकडची 2019 ची विधानसभा निवडणूक पहा… विखे गट काय करु शकतो, याची कित्येक उदाहरणे नगरच्या राजकारणात सापडतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विखे काँग्रेसमधून भाजपात आले. त्यावेळी थोड्या-थिडक्या नाही तर, भाजपच्या पाच विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. अकोल्यात वैभव पिचड, कोपरगावात स्नेहलता कोल्हे, नेवाशात बाळासाहेब मुरकुटे, राहुरीत शिवाजीराव कर्डिले आणि कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या पाचही नेत्यांनी त्यावेळी आपला पराभव हा विखेंमुळेच झाल्याची तक्रार थेट भाजपच्या राज्य नेतृत्त्वाकडे केली होती. परंतु, विखेंची नगर जिल्ह्यातील ताकद माहिती असल्याने फडणवीस, बावनकुळे किंवा भाजपच्या अन्य नेत्यांनी त्या तक्रारीची जास्त गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. अगदीच अलिकडचं उदाहरण पहायचं म्हटलं तर, 2024 च्या विधानसभेचं देता येतं. नगर दक्षिण लोकसभेत सुजय विखेंचा पराभव ज्या नेत्यांमुळे झाला, त्या सगळ्या नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत ओळीने पराभव झाला. आता हा पराभव विखेंमुळेच झाला, असं काहीजण मान्य करतात, तर काहीजण मान्य करत नाही, हा भाग वेगळा… पण विखेंशिवाय नगर जिल्ह्याचं राजकारण पूर्ण होत नाही, हे या निकालानंतर दिसलं. संगमनेरमध्ये थोरातांचा पराभव, पारनेरमध्ये राणी लंके यांचा पराभव, या अशक्य वाटणाऱ्या शक्यता केवळ सुजय विखेंमुळेच पूर्ण झाल्या, हेही नाकारून चालत नाही.

चला, तर आता राहुरी कारखाना निवडणुकीच्या मुख्य मुद्याकडे येऊ… राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे कारखान्यातील प्रतिष्ठेच्या बनवलेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. तनपुरे गटाच्या जनसेवा पॅनलने शेतकरी विकास मंडळाचा 21-0 च्या फरकाने सुपडा साफ केला. ज्या तनपुरेंचा विधानसभेला पराभव झाला, त्याच तनपुरे कुटुंबाने नेतृत्व केलेल्या पॅनलने बाजी मारली. अरुणराव तनपुरे यांच्या विरोधातील राजू शेटे यांच्या पॅनेलचा पराभव झाला. मात्र भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी हिशोब चुकता केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली. तनपुरे गटाच्या पॅनलच्या मोठ्या विजयात सुजय विखेंची तटस्थ भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा सुरु झाली.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंच्या विरोधात काम करत राजू शेटे यांनी खासदार निलेश लंके यांच्यासाठी उघडपणे काम केले होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी बदला घेण्याची जणू मोहीमच सुरू केली. विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, पारनेर येथे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अशा दिग्गजांना पराभूत करत आपल्या पराभवाचा वचपा काढला. त्यामुळे आता तनपुरे कारखाना निवडणुकीत विखे काहीच करणार नाही, असं होणार नव्हतं. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी तटस्थ भूमिका निभावली.

मतदानापूर्वी सुजय विखे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घ्या, असं आवाहन सभासद शेतकऱ्यांना व्हिडीओद्वारे केलं होतं. सुजय विखेंची हीच तटस्थ भूमिका खरं तर राजू शेटे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. विखे व कर्डिले या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली. खरं तर येथेच राजू शेटे यांच्या पराभवाची बिजे रोवली गेली. परंतु राजू शेटे यांच्यासाठीच या दोन्ही नेत्यांनी माघार घेतली अशा चर्चा रंगविण्यात आल्या. परंतु निकालानंतर सगळं गणित बिघडल्याचं दिसलं. कोल्हार, वांबोरी, टाकळीभान एवढंच काय पण विखेंचा गट जेथे-जेथे सक्रीय आहे, त्या सगळ्या गटात राजू शेटेंच्या पॅनलला मोठे नुकसान सहन करावे लागल्याचे दिसले. राजू शेटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बळावर आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्याऊलट जनसेवा पॅनेलचे नेतृत्व करणारे अरुण तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना यश मिळाले.

विधानसभा निवडणुकीत विखेंनी प्राजक्त तनपुरेंचा तर कारखाना निवडणुकीत विखेंनी राजू शेटे यांचा बदला पूर्ण केला, अशा चर्चा सुरु झाल्या. तनपुरे गटातील काही उमेदवारांना विखेंची मदतही मिळाल्याची चर्चा झाली. शेतकरी विकास आघाडीला ग्राउंड लेव्हलला काम करण्यासाठी निष्ठावंतांची फौज उभी करता आली नाही. विखे तथा भाजपचा दुसरा गट तनपुरे गटाला मदत करताना दिसला. युवा नेते उदयसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे प्रचारात कुठेही दिसले नाही. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी मते टाकली. ती कोणाला याचीही चर्चा झाली. राजू शेटे यांची सर्व मदार कर्डिले व विखे गटावर अवलंबून होती. यात कर्डिले गटाने मदत केल्याची चर्चा आहे. मात्र कर्डिले गटाची राहुरीतील सहकारात ताकद मोठी नाही, हेही वास्तव आहे. त्यापेक्षा विखे गट राहुरी तालुक्यात बलवान आहे. मात्र त्यांनी पूर्णतः अलिप्त धोरण घेतले आणि या अलिप्त धोरणात विखेंनी बदला पूर्ण केला, अशा चर्चा रंगल्या.

या निवडणुकीनंतर तनपुरे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी बुस्टर डोस मिळाला, हे नाकारून चालत नाही. परंतु या निकालावरुन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नाही, हेही तितकेच खरे. कारण पक्षाने आदेश दिल्यानंतर विखे-कर्डिले गटाला, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News