Maharashtra News : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील काही मोठे प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आले होते. यामुळे महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली. पण, काही उद्योग दुसरीकडे गेले असले तरी देखील महाराष्ट्राला काही नवीन प्रकल्पाची भेट मिळाली आहे.
आगामी काळात महाराष्ट्रात आणखी काही नवीन प्रकल्प विकसित होणार आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी JSW ग्रुपने महाराष्ट्रातील विदर्भ विभागात जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारण्याची घोषणा केली होती.

जेएसडब्ल्यू ग्रुप विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारणार आहे. यामुळे हजारो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. नक्कीच हा प्रकल्प राज्यासाठी एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात एक महाकाय प्रकल्प उभारला जाणार आहे.
या जिल्ह्यात तयार होणार अंबानींचा महाकाय प्रकल्प
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची सबसिडरी कंपनी महाराष्ट्रात एक भव्य डिफेन्स प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प आपल्या कोकणात विकसित होईल.
या प्रकल्पात स्फोटके, बॉम्ब, दारुगोळा आणि इतर लहान शस्त्र तयार केली जाणार आहेत. हा प्रकल्प दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात विकसित होणार असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.
कसा असणार हा भव्य प्रकल्प?
आतापर्यंत जेवढी माहिती मिळाली आहे त्यानुसार या प्रकल्पाअंतर्गत रिलायन्स डिफेन्स लिमिटेडद्वारे ‘धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी (DADC)’ उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील वाटड औद्योगिक परिसरात 1000 एकर जमिनीवर साकारला जाणार असून या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी समवेतच संपूर्ण कोकणातील विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत विकसित होणाऱ्या फॅक्टरीमध्ये स्फोटके, दारूगोळा आणि लहान शस्त्रे तयार केली जाणार आहेत.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणारा हा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील भारतातील सर्वाधिक मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प राहणार आहे. यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास व रोजगार संधी निर्माण होणार अशीही माहिती जाणकारांनी दिली आहेत.
प्रकल्पासाठी किती गुंतवणूक केली जाणार?
या भारतातील सर्वात मोठ्या डिफेन्स प्रोजेक्ट बाबत बोलायचं झालं तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची सबसिडरी कंपनी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड या कंपनीकडून हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
खरे तर सरकारकडून रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनीला शस्त्रास्त्र बनवण्याचा परवाना मिळालेला आहे. रिलायन्सचा उपराजधानी नागपूरच्या मिहानमध्ये एक मोठा प्रकल्प सुरू आहे. फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या दोन आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत रिलायन्स कडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान आता रत्नागिरीत नवीन भव्य प्रकल्प साकारला जाणार असून या प्रकल्पासाठी पुढील पाच वर्षात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने यासाठी जगातील सहा नामांकित आणि आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत करार केलेले आहेत.