Maharashtra New Expressway : काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा कालपासून सर्वसामान्यांसाठी अधिकृतरित्या खुला करण्यात आला आहे.
या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाले असल्याने आता नागरिकांना समृद्धी महामार्गाने थेट नागपूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. यामुळे सोळा तासांचा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण होईल असा दावा सुद्धा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान कालच्या लोकार्पण सोहळ्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे आणि ती घोषणा म्हणजे राज्याला एक नवीन महामार्ग मिळणार असून समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे.

कसा असणार नवा मार्ग?
गुरुवारपासून समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. यामुळे आता मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात आणि मुंबई ते नाशिक हा प्रवास अवघ्या अडीच तासात शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की येत्या काळात समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. भविष्यात समृद्धी महामार्ग थेट पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरा सोबत जोडला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्याच्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील 24 जिल्हे जेएनपीटी बंदरासोबत जोडले गेले आहेत. दरम्यान आता भविष्यात हा महामार्ग वाढवन बंदरापर्यंत वाढवला जाईल आणि यामुळे राज्यातील अनेक जिल्हे वाढवण बंदरासोबत कनेक्ट होणार आहे. जेएनपीटी आणि वाढवन हे दोन्ही बंदरे समृद्धी महामार्गाला जोडले जाणार असल्याने यामुळे राज्याच्या विकासात मोठी भर पडणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल अस आपण म्हणू शकतो.
समृद्धी महामार्गाचा विस्तार कसा असणार?
समृद्धी महामार्गाचा वाढवण बंदरापर्यंतचा विस्तार कसा असणार? मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्ग वाढवण बंदरासोबत कनेक्ट करण्यासाठी इगतपुरी ते वाढवण असा नवा मार्ग विकसित होणार आहे. हा नवा मार्ग 123.4 किलोमीटर लांबीचा राहील. नव्या मार्गामुळे इगतपुरी येथून दीड ते दोन तासात वाढवण बंदरापर्यंत पोहोचता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाकडून चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार आहे. या नव्या महामार्गामुळं विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट बंदरापर्यंत पोहोचवता येणार अशी माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे.