असंख्य लाभ, पण तितकेच कठीण व्रत! जाणून घ्या निर्जला एकादशीच्या पारणाचे नियम, पूजाविधी आणि शुभ वेळ

Updated on -

Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीचे उपवास अत्यंत कठीण पण तितकेच फायदे देणारे मानले जातात. हिंदू धर्मात या एकादशीला मोठे महत्व आहे. ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला येणारा हा उपवास 2025 मध्ये 6 जून म्हणजेच आज आहे. या दिवशी अन्न आणि पाणी न घेता केलेला उपवास संपूर्ण वर्षातील 24 एकादशींच्या व्रतासमान पुण्य देतो, असे मानले जाते. त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व आहे. उपवास करणारे भक्त भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करतात.

ही एकादशी वर्षातील इतर एकादशींपेक्षा वेगळी आणि कठीण मानली जाते कारण या दिवशी उपवास करणारे व्यक्ती पाणी, फळे, दूध किंवा कोणताही आहार घेत नाहीत. पूर्ण दिवस भक्ती, मंत्रजप, व्रतकथा आणि ध्यान यामध्ये व्यतीत केला जातो. ही एकादशी केवळ आत्मसंयमाची परीक्षा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सेवा यांचा संगम आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी या दिवशी उपवास पाळणं अत्यंत फलदायी मानलं जातं.

शुभ वेळ-

2025 मध्ये निर्जला एकादशी 6 जून रोजी पहाटे 2:15 वाजता सुरू झाली असून ती 7 जून रोजी पहाटे 4:47 वाजता संपेल. उपवासाच्या पारणासाठी योग्य वेळ 7 जून रोजी दुपारी 1:44 ते 4:31 या वेळेत आहे. पारण नेहमी द्वादशी तिथीमध्ये करावे, असा शास्त्रीय सल्ला दिला जातो.

या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून भगवान विष्णूची पूजा करावी. तुपाचा दिवा लावावा, तुळशीची पाने अर्पण करावी आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा. दिवसभर भजन, कीर्तन किंवा भगवद्गीता पठण केल्यास विशेष पुण्य लाभते. उपवास करताना मन संयमी ठेवून, सेवा आणि परोपकार यावर भर द्यावा.

पारणाच्या दिवशी सकाळी स्नानानंतर भगवान विष्णूला सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच प्रसाद म्हणून सेवन करावा. या प्रकारे पारण केल्याने उपवासाची पूर्ती होते आणि धार्मिक फलप्राप्ती होते.

दान करण्याचे महत्व-

निर्जला एकादशीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. अन्नधान्य, पंखे, वस्त्रे किंवा द्रव्यदान केल्यास विशेष पुण्य मिळते. अशा दानाचे पुण्य आयुष्यभर लाभदायक ठरते, असा धार्मिक विश्वास आहे.

ही एकादशी ‘भीमसेनी एकादशी’, ‘पांडव एकादशी’ किंवा ‘भीम एकादशी’ म्हणूनही ओळखली जाते. या व्रताची कथा महाभारतातील भीमशी जोडलेली आहे, ज्यांनी ही एकादशी पाळून सर्व एकादशींचं पुण्य मिळवलं. त्यामुळे जे लोक वर्षभर इतर एकादशीचे व्रत पाळू शकत नाहीत, त्यांच्यासाठीही हा दिवस विशेष पुण्यदायी मानला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe