Explained : नगरच्या राजकारणात बदलतंय समीकरण ? थोरात ते कर्डिले… हिंदूत्वाच्या राजकारणात कोण पुढे, कोण मागे?

Published on -

Explained : मी हिंदूंच्या मतांवर निवडून आलो आहे. मला मुस्लिम मतांची गरज नाही… हे स्टेटमेंट आहे आ. शिवाजी कर्डिले यांचे… तर, रामेश्वर मंदीराच्या सुशोभिकरणासाठी मी आत्तापर्यंत 15 कोटी रुपये दिले, असा दावा माजी आ. बाळासाहेब थोरात यांनी केला. आता हे दोन्ही वक्तव्ये गुरुवारची आहेत. आता तुम्ही म्हणाल, या दोन्ही आमदारांच्या वक्तव्याचा काय सबंध? तर संबंध आहे. खूप मोठा संबंध आहे. आ. शिवाजीराव कर्डिले असो किंवा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असो, या दोघांनीही यापूर्वी कधीच एवढी कट्टर हिंदूत्ववादी भूमिका घेतलेली दिसली नाही. आ. कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील वादग्रस्त हिंदू ध्वज बांधकाम प्रकरणावरुन तेथे भेट दिली. त्यावेळी आपली कट्टर हिंदूत्ववादी भूमिका जाहीर केली.

तर, संगमनेर तालुक्यातील रामेश्वर येथील शिवपुराण कथेच्या सांगता कार्यक्रमात तालुक्यातील मंदीरांच्या जिर्णोद्धाला दिलेली देणगी माजी आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितली… जो धर्म की बात करेगा, वो ही देश पे राज करेगा… ही टॅगलाईन आपण लोकसभा निवडणुकीवेळी ऐकली होती. त्याचा परिणामही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसला होता. दोन्हीकडे भाजपची सत्ता आली होती. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्यांना हिंदूत्वाची भूमिका महत्त्वाची वाटू लागल्याचे दिसू लागले आहे. आगामी निवडणुका व हिंदूत्ववादी भूमिका याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

भाजपच्या नेत्यांनी हिंदूत्तवादी भूमिका घेऊन देशात व राज्यात सत्ता मिळवली, हे वास्तव कुणीही नाकारत नाही. तरीही, विखेंसारखे भाजपचे नेते प्रखर हिंदू भूमिका घेताना दिसले नाहीत. अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे 12 पैकी 10 आमदार निवडून आले, त्यात हिंदूत्ववादी भूमिका महत्त्वाची राहिली. महायुतीचा पराभव झालेल्या श्रीरामपूर व कर्जत-जामखेड या दोन्ही मतदारसंघाची परिस्थीती काहीशी वेगळी होती. श्रीरामपूरमध्ये निवडून आलेल्या काँग्रेसच्या आ. हेमंत ओगले यांना महायुतीत झालेल्या मतविभागणीचा फायदा मिळाला.

शिवाय सागर बेग यांच्यासारख्या हिंदू नेत्याने अपक्ष लढवून मिळविलेल्या मतांचाही फायदा झाला. आ. रोहित पवारांना कर्जत जामखेडमध्ये प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात यावेळी चांगले झुंजावे लागले. अगदी काठावर ते निवडून आले. म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा हा हिंदूत्ववादी विचारांकडे झुकत चालला आहे, हे या निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. कधीकाळी सेक्युलर विचारसरणीचा, हा जिल्हा गेल्या काही वर्षांत भगवा झाला आहे. त्यामुळे सहाजिकच जिंकलेल्या व पराभूत झालेल्या नेत्यांनाही हिंदूत्ववादी विचारांचे महत्त्व पटल्याचे दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नगरचे आ. संग्राम जगताप हे कट्टर हिंदूत्ववादी चेहरा म्हणून पुढे आले. नगर शहरातील हिंदू नेत्यांची गरज ओळखून त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. स्व. अनिलभैय्या राठोड यांच्यानंतर हिंदू नेत्याची झालेली पोकळी भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले गेले. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक ताब्यात ठेवायची असेल, तर हिंदूत्तवादी भुमिकेशिवाय पर्याय नाही, ही गरज आ. जगताप यांनी वेळीच ओळखली. शिर्डीतील मुस्लिमविरोधी प्रकरण, मढीतील मुस्लिमविरोधी प्रकरण किंवा थेट कर्जतमधील प्रकरणात आ. संग्राम जगताप फ्रंटफूटवर राहिले. त्यामुळे विधानसभा झाल्यानंतरही, नगर शहरात आ. संग्राम जगताप यांची क्रेझ वाढतच गेल्याचे दिसले. त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावत गेल्याचेच जाणवले.

आता येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय नगर मनपाची निवडणूकही होत आहे. या सगळ्या निवडणुका प्रत्येक नेत्याच्या आगामी राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आता सत्ताधारी व विरोधकही हिंदूत्तवादी विचारांकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे 111 फुटी शिवस्वराज्य ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाभोवती ओटा बांधण्याच्या बांधकामावरुन दोन समाजात वाद झाला. गेल्या महिन्यांत ग्रामसभा घेऊन तो वाद मिटल्याचे सांगितले गेले. परंतु या ध्वजाभोवती फक्त 3 फुटांचा ओटा बांधण्यास हिंदू समाजातील तरुण तयार नव्हते. अखेर वाद वाढला.

याच वादात मध्यस्थी करण्यासाठी आ. शिवाजी कर्डिले यांनी थेट बारागाव नांदूर गाठले. हिंदू संघटनांना जेवढा हवा होता, तेवढा ओटा बांधण्याचे काम तातडीने आ. कर्डिले यांच्या उपस्थितीत सुरु झाले. याच कार्यक्रमात बोलताना आ. कर्डिले यांची कट्टर हिंदूत्तवादी भूमिका दिसली. मी हिंदू्ंच्या मतांवर आमदार झालो आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील हिंदू बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे माझे काम आहे, असे म्हणत त्यांनी हिंदू समाजाला ताकद दिली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी आ. कर्डिलेंनी हिंदूत्वाचे रणशिंग फुंकल्याचे यावरुन दिसले.

आ. कर्डिले हे भाजपचेच आमदार असल्याने त्यांची ही भूमिका योग्य होती. परंतु खरी गम्मत आली ती, संगमनेर तालुक्यातील रामेश्वर येथे झालेल्या शिवपुराण कथेच्या सांगता कार्यक्रमात… या कार्यक्रमात आ. अमोल खताळ व माजी आ. बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. या दोघांनीही एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. आ. खताळ यांनी हिंदूत्ववादी भूमिका घेत तालुक्याची आमदारकी मिळवली, हे नाकारुन चालत नाही. त्यामुळेच माजी आ. थोरातांनीही काहीसे हिंदू धर्माकडे झुकण्याची भूमिका घेतल्याचे या कार्यक्रमात दिसले. संगमनेर तालुक्यातील रामेश्वर मंदीराला आपल्या कार्यकाळात 15 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. शिवाय संगमनेर तालुक्यातील इतर अनेक मंदीरांचा जिर्णोद्धारही केल्याचे त्यांनी सांगितले. थोडक्यात काय? तर थोरातांची भूमिका काही प्रमाणात का होईना, पण हिंदूत्ववादी झाल्याचे दिसले.

आगामी काळात आ. जगताप, आ. कर्डिलेच काय, पण अगदी विरोधकही हिंदूत्ववादी भुमिकेत दिसतील, अशीही शक्यता वाढली आहे. राहुरीतील तनपुरे, नेवाशातील गडाख, पाथर्डीचे ढाकणे, नगरचे कळमकर, पारनेरचे लंके, श्रीगोंद्याचे जगताप- नागवडे हेही कदाचित आगामी काळात हिंदूत्त्वाची कास धरतील का? हा खरा प्रश्न आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe