Ahilyanagar News: शिर्डी- पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी गरज आणि आव्हान असणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानने ही बाब ओळखून १५ वर्षाचा दृष्टीकोन ठेवत केलेले नियोजन म्हणजे एक यशस्वी आणि दूरगामी धोरणात्मक पाऊल ठरणार आहे. ११० कोटी रुपयांच्या प्रकल्पातून जलसाठा, शुद्धीकरण आणि पुरवठा यावर केंद्रित हा उपक्रम संस्थानच्या विकासासोबतच पर्यावरण जपणारा ठरणार आहे.
याबाबत संस्थानमधील सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की शिर्डी साईबाबा संस्थानने पुढील १५ वर्षांच्या पाणीविषयक गरजांचा अभ्यास करून जलसाठा व पाणीपुरवठा यासाठी व्यापक आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत निमगाव कोऱ्हाळे शिवारातील पाच एकर जमिनीवर सहा कोटी ५० लाख लिटर (६५ एमएल) क्षमतेचा पाणी साठवण तलाव पूर्ण करण्यात आला असून, त्याच शेजारी आणखी एक नवीन तलाव बांधण्यात येणार आहे.

लोखंडी पाईप्सची खरेदी
या प्रकल्पासाठी ११० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या खर्चास साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये साठवण तलावासोबतच जलशुद्धीकरण प्रकल्प व पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या साठवलेल्या व शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर साईबाबा संस्थान संबंधित साई आश्रम, मेघा धर्मशाळा, साईबाबा मंदिर, एक हजार व पाचशे खोल्यांचे निवासस्थान, द्वारावती, साईनाथ हॉस्पिटल, साईबाबा सुपर हॉस्पिटल, कामगार निवासस्थान या ठिकाणी पाईपलाईनद्वारे करण्यात येईल. यासाठी लोखंडी पाईप्स खरेदी करून आधीच जागेवर आणण्यात आले आहेत.
११० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी
११० कोटींच्या खर्चास साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती अंजु शेंडे सोनटक्के व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुरी मिळाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या खर्चासाठीचा प्रस्ताव आता न्यायालयाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पूर्वी संस्थानच्या कणकुरी शिवारातील चार तळ्यांची साठवण क्षमता एक कोटी लिटर होती.
काम प्रगतीपथावर
त्याठिकाणीही जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यरत आहेत, मात्र हे प्रकल्प जुन्या स्वरूपाचे असल्यामुळे भविष्यातील वाढत्या गरजांनुसार हे अपुरे ठरू शकतात. त्यामुळेच नवीन साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र आणि पाईपलाईन प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. सध्याचे काम जलद गतीने सुरु असून पहिल्या तलावाचे बांधकाम आणि वॉल कंपाऊंड पूर्ण झाले आहे.
पाण्याची समस्या सुटणार
शिर्डी साईबाबा संस्थानने पुढील १५ वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन केलेला हा जलसाठा व वितरण प्रकल्प, एक दूरदृष्टीचा आदर्श नमुना ठरणार आहे. धार्मिक पर्यटन केंद्राच्या गरजा पार पाडण्यासाठी अशी योजनाबद्ध आणि पर्यावरणपूरक पावले अन्य धार्मिक संस्थानांसाठीही प्रेरणादायी ठरतील.