जेएनपीए बंदर ते मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील वातानुकूलित स्पीडबोट सेवा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तांत्रिक अडथळ्यामुळे ही सेवा लांबणीवर पडली आहे. ही स्पीडबोट सेवा सुरू झाल्यास या जलमार्गावरील वातानुकूलित ई-स्पीडबोटमधून हा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे उरण परिसरातील प्रवाशांना या सेवेची प्रतीक्षा आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत.
अवघ्या २५ मिनिटांत पोहोचता येणार
जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय जेएनपीएच्या संचालक मंडळाने घेतला आहे. नव्या वर्षांपासून प्रवाशांची बंदरातून मुंबईत ने-आण करण्यासाठी अद्ययावत स्पीडबोटी धावणार आहेत. या प्रदूषण विरहित स्पीडबोटीमुळे जेएनपीए ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान अवघ्या २५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. या सागरी मार्गाने जेएनपीएचे कामगार, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सीमाशुल्क, सीआय एसएफ, बंदर उपभोक्ता आदी कामगारांसाठी वापर करता येणार आहे.

प्रदूषण विरहित सुसज्ज बोटी
जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याजागी प्रदूषण विरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या सुसज्ज अशा बोटींचा पर्याय निवडला आहे. या स्पीड बोटींचा पर्याय राबवण्याची संकल्पना जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी मांडली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी जेएनपीए प्रशासनाने जय्यत तयारी केल्याची माहिती जेएनपीएचे उपसंरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली आहे.