पाकिस्तान, तुर्की, चीन आणि…; भारत शत्रू देशांकडून काय -काय खरेदी करतो?, पाहा यादी!

Published on -

जगात कोणता देश शत्रू आहे आणि कोणता मित्र, हे केवळ कागदोपत्री असतं. वास्तविकतेत मात्र राष्ट्रांचे संबंध गरजांवर आधारित असतात. राजकीय मतभेद, सीमेवरचे तणाव, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर टोकाची भूमिका या गोष्टी एकीकडे असल्या, तरी दुसरीकडे व्यापारी हितसंबंध कधीच पूर्णपणे थांबत नाहीत. भारताचंही असंच काहीसं चित्र आहे. पाकिस्तान, चीन, तुर्की यांसारख्या देशांबरोबर राजकीय मतभेद असूनसुद्धा, आर्थिक देवाणघेवाण मात्र अनेक पातळ्यांवर सुरूच आहे.

पाकिस्तानमधील आयात

 

उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तानचा उल्लेख सर्वप्रथम करावा लागेल. सीमावाद, दहशतवाद आणि राजकीय तणाव यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये कटुतेचा इतिहास आहे. तरीही भारत आजही काही निवडक गोष्टींसाठी पाकिस्तानवर अवलंबून आहे. यात सर्वसामान्य घराघरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रॉक सॉल्टचा समावेश आहे. पाकिस्तानी खेवरा खाणीतून मिळणाऱ्या या खड्याच्या मिठाला उपवास, धार्मिक विधी आणि सौंदर्य उपचारांमध्ये विशेष महत्त्व आहे. इतकंच नव्हे तर मुलतानी मातीसारखा सौंदर्यद्रव्यांचा घटकसुद्धा तिकडून आयात होतो.

पाकिस्तानकडून भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये फळं, सुकामेवा, चामड्याच्या वस्तू आणि कच्चा कापूसही आहे. हे सर्व भारतीय कापड व अन्न उद्योगासाठी उपयुक्त आहेत. 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुमारे 2.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता, ज्यामध्ये कापूस आणि सुकामेव्याचं महत्वाचं स्थान होतं. विशेषतः काश्मीर मार्गे दिल्लीच्या बाजारपेठेत येणाऱ्या पाकिस्तानी टरबूजांपासून ते मनुका आणि बदामापर्यंतचा प्रवास चक्क रोजच्या खरेदीत दिसतो.

तुर्कीमधील आयात

तुर्कीबद्दल बोलायचं झालं, तर भारताचे संबंध अलीकडे तणावपूर्ण झाले असले तरी व्यापार सुरूच आहे. तुर्कीहून भारतात हस्तनिर्मित गालिचे, सुंदर मोज़ेक दिवे आणि घर सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या टाइल्स मोठ्या प्रमाणावर येतात. मुंबईतील कुलाबा किंवा दिल्लीच्या हौज खास मार्केटमध्ये अशा वस्तू सहजपणे सापडतात. याशिवाय, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, हेझलनट्स आणि चेरी यांसारखे अन्नपदार्थही भारतात तुर्कीहून येतात. तणावाच्या पार्श्वभूमीवर या वस्तूंवर बहिष्कार टाकावा अशी मागणी होत असली, तरी मोठ्या शहरांमधील सुपरमार्केटमध्ये अजूनही यांची मागणी आहेच.

चीनमधील आयात

भारत-चीन संबंधांमध्ये तणावाचं सावट कायम असलं, तरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चीनचं वर्चस्व स्पष्टपणे जाणवतं. मोबाइल, टेलिव्हिजन, स्पीकर आणि सुटे भाग यांसारख्या वस्तूंसाठी भारत अजूनही चीनवर खूप प्रमाणात अवलंबून आहे. 2021-22 मध्ये एकट्या इलेक्ट्रॉनिक आयातीवरच भारताने जवळपास 3,000 कोटी डॉलर्स खर्च केला होता, ज्यात 70% हिस्सा फक्त चीनकडून आलेल्या वस्तूंचा होता.

बांगलादेश

याशिवाय, भारत बांगलादेशकडून कापड आणि रासायनिक उत्पादने घेतो. हे उत्पादने फॅशन उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. बांगलादेशचा वस्त्रोद्योग भारतासाठी केवळ किफायतशीरच नाही, तर दर्जेदार पर्याय मानला जातो. नेपाळ आणि म्यानमारसारख्या शेजारी देशांकडूनही मसाले, चहा आणि इतर कृषी उत्पादने सातत्याने भारतात येतात. हे सर्व व्यापार केवळ व्यावसायिक कारणांपुरते मर्यादित नसून, एकप्रकारे शेजारी देशांबरोबरचा संवाद टिकवून ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News