देशसेवा आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी चालून आली आहे. अग्निपथ योजना 2025 अंतर्गत ‘अग्निवीर’ बनण्याचा मार्ग खुला झाला असून, केवळ चार वर्षांत लष्करी अनुभव, आकर्षक पगार, विमा सुरक्षा आणि भविष्यातील करिअर संधी यांचे एकत्रित लाभ मिळवता येतात. या योजनेने गेल्या काही वर्षांत तरुणांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे आणि आता 2025 मध्ये पुन्हा अर्ज करण्याचा मार्ग सुरू होतो आहे.

अग्निपथ योजना ही 14 जून 2022 रोजी सुरू करण्यात आली होती. यामध्ये देशभरातील 17.5 ते 21 वयोगटातील तरुणांना थेट सैन्य, नौदल आणि हवाई दलात सामील होण्याची संधी दिली जाते. सामील झालेल्यांना ‘अग्निवीर’ असे संबोधले जाते. ही योजना केवळ देशसेवेसाठी नाही, तर तरुणांच्या शिस्तबद्ध जीवनशैली, देशप्रेम आणि कौशल्यविकासासाठी एक मजबूत आधारस्तंभ बनली आहे. 4 वर्षांच्या सेवेनंतर सर्व अग्निवीरांना कायम नोकरी दिली जात नाही, मात्र त्यांच्या कामगिरीनुसार 25% अग्निवीरांना सैन्यातच कायम ठेवण्यात येते.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. ज्या तरुणांना अग्निवीर होण्याची इच्छा आहे, त्यांनी लष्कराच्या संबंधित अधिकृत वेबसाइटवर वेळेत फॉर्म भरावा लागतो. उदाहरणार्थ, हवाई दलात सामील होण्यासाठी अर्ज 7 जानेवारी 2025 पासून 27 जानेवारी 2025 पर्यंत agnipathvayu.cdac.in या वेबसाइटवर उपलब्ध होते. काही वेळा महाविद्यालयीन कॅम्पस आणि विशेष भरती शिबिरांतूनही अर्ज प्रक्रिया राबवली जाते.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो, आणि इतर वैयक्तिक ओळखपत्रे असतात. याशिवाय, अर्जदाराने अग्निपथ योजनेविरोधात कोणताही हिंसक निषेध न केल्याचा शपथपत्र देखील आवश्यक आहे.
पगार किती मिळतो?
पगाराबाबत बोलायचं झालं तर अग्निवीरांना पहिल्या वर्षी महिन्याला ₹30,000 मिळतात आणि ही रक्कम चौथ्या वर्षी ₹40,000 पर्यंत वाढते. यापैकी 70% रक्कम थेट हाती मिळते, तर 30% रक्कम एका विशेष सेवानिधीत जमा होते, ज्यात सरकारसुद्धा तेवढेच योगदान देते. सेवा पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना करमुक्त ₹11.71 लाखांचा निधी मिळतो. त्याचबरोबर त्यांना ₹48 लाखांचा जीवन विमा आणि सेवा दरम्यान जोखीम भत्ता मिळतो, जे त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरतो.
योजनेत निवड झाल्यानंतर तरुणांना एक कठोर प्रशिक्षण कालावधी पार करावा लागतो. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद आणि देशसेवेसाठी सज्जतेचे धडे दिले जातात.
चार वर्षांच्या सेवेनंतर जर अग्निवीर सैन्यात कायम झाले नाहीत, तरी त्यांच्या हाती एक विश्वासार्ह प्रमाणपत्र दिलं जातं, जे भविष्यातील नोकऱ्यांमध्ये विशेषतः CAPF, राज्य पोलिस व अन्य सरकारी-खाजगी क्षेत्रांमध्ये त्यांना प्राधान्य मिळवून देतं.
मध्य प्रदेशमधील भरती 2025
यंदा मध्य प्रदेशात होणाऱ्या भरती प्रक्रियेबाबत सांगायचं झालं, तर 30 जून ते 10 जुलै 2025 दरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. ग्वाल्हेरमध्ये एकट्या पहिल्या टप्प्यात 32,708 उमेदवार परीक्षा देतील. 15 जूननंतर प्रवेशपत्र जाहीर होतील आणि निकाल जुलैच्या अखेरीस अपेक्षित आहे.