आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करायचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक आई-वडिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना, आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि जीवनातल्या मोठ्या टप्प्यांसाठी आर्थिक तयारी करणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक झालं आहे. याच गरज लक्षात घेऊन एलआयसीने एक अशी खास योजना आणली आहे, जी दररोज फक्त 150 रुपयांची छोटीशी गुंतवणूक करून मोठा निधी उभा करू शकते.

‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’
भारतीय जीवन विमा महामंडळाची ही योजना म्हणजे ‘न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन’. नावातच स्पष्ट आहे की ही योजना केवळ मुलांसाठी आहे आणि त्यांचं भविष्य सुकर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही एक पारंपरिक, नॉन-लिंक्ड आणि मनी बॅक सुविधा असलेली योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे फक्त पैसा साठवणं नव्हे, तर आपल्या बाळाच्या आयुष्यभराच्या स्वप्नांची पायाभरणी करणं होय. या योजनेची सुरुवात मुलाच्या जन्मानंतर कधीही म्हणजे 0 ते 12 वयाच्या दरम्यान केली जाऊ शकते.
या योजनेची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे दररोज फक्त 150 रुपये गुंतवून, 25 वर्षांनंतर तब्बल 19 लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. सुरुवातीपासून विचार केला तर ही रक्कम दरमहा सुमारे 4,500 रुपये होते आणि वार्षिक 55,000 रुपये. हे पैसे नियमितपणे 25 वर्षे गुंतवल्यास जवळपास 14 लाख रुपयांचा मूळ निधी तयार होतो. परंतु एलआयसीने या योजनेत मॅच्युरिटी दरम्यान दिला जाणारा बोनस आणि इतर लाभ लक्षात घेतल्यास एकूण रक्कम 19 लाखांपर्यंत पोहोचू शकते.
या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पैसे परत मिळण्याचा कालावधी ठराविक टप्प्यांवर विभागलेला आहे. मूल जेव्हा 18, 20, 22 आणि शेवटी 25 वर्षांचे होईल, तेव्हा या वयात त्यांना हप्त्यांमध्ये पैसे परत मिळतात. यामुळे शिक्षणाचे टप्पे, स्पर्धा परीक्षा, करिअरची सुरुवात अशा महत्त्वाच्या क्षणांमध्ये आर्थिक आधार मिळतो. अंतिम हप्त्यामध्ये उर्वरित रक्कम आणि जमा झालेला बोनसही दिला जातो. ही एकप्रकारे आपल्या गुंतवणुकीचे फळ आणि आपल्या मुलाच्या भविष्याची गॅरंटी ठरते.
कमीम कमी 1 लाख गुंतवणूक
गुंतवणुकीच्या सुरुवातीला कमीत कमी 1 लाख रुपयांची विमा रक्कम आवश्यक आहे, पण जास्तीत जास्त किती गुंतवणूक करायची यावर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे आपल्या गरजेनुसार किंवा उत्पन्नानुसार गुंतवणूक वाढवणे शक्य आहे. या योजनेचा एक मोलाचा फायदा म्हणजे मृत्यू लाभ. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसीच्या कालावधीत झाला, तर गुंतवणुकीच्या 105 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम त्यांच्या नावाजलेल्या व्यक्तीला दिली जाते. यामुळे पालक नसले तरी मूल सुरक्षित असतं.
आणखी एक दिलासा म्हणजे, या योजनेवर कर्जही मिळू शकतं. ही सुविधा दोन वर्षांनंतर उपलब्ध होते. म्हणजे, गरज लागल्यास मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर आवश्यक खर्चासाठी सहजपणे कर्ज घेता येते.