Chemical Stock India:- आजच्या शेअर बाजारात एका केमिकल कंपनीच्या शेअर्सनी लक्ष वेधून घेतलं. भारत रसायन लिमिटेड या कंपनीचे शेअर्स अचानक जोरात उसळले आणि गुंतवणूकदारांनीही मोठी खरेदी सुरू केली. या खरेदीमागे कंपनीने जाहीर केलेले तिमाही निकाल आणि लाभांश यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला.
भारत रसायनच्या शेअर्सची आज कशी झाली सुरुवात?
भारत रसायनच्या शेअर्सची सुरुवातच आज जोरात झाली. बीएसईवर सकाळी हे शेअर्स ९२५० रुपयांवर उघडले आणि दिवसभरात त्यांची किंमत तब्बल १३.६५ टक्क्यांनी वाढत १०२२९ रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजेच एका दिवसात तब्बल १००० रुपयांच्या आसपासची उसळी यामध्ये दिसून आली. पण याआधी काही दिवस हा शेअर फारसा आकर्षक वाटत नव्हता. कारण गेल्या काही महिन्यांत त्याची किंमत जवळपास १६ टक्क्यांनी घसरली होती.

मात्र, या वाढीमागे काही विरोधाभासही आहेत. कंपनीचा नुकताच आलेला तिमाही निकाल फारसा समाधानकारक नाही. जानेवारी ते मार्च या कालावधीत भारत रसायनचा निव्वळ नफा मोठ्या फरकाने म्हणजे जवळपास ६२ टक्क्यांनी घटून केवळ २५ कोटी रुपये राहिला. मागच्या वर्षी याच काळात तो ६७ कोटी रुपयांवर होता. महसूल देखील किंचितसा घसरला असून तो ३०९ कोटी रुपयांवरून तो ३०६ कोटी रुपयांवर आला आहे.
गुंतवणूकदारांचा मात्र विश्वास
तरीही गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्सवर विश्वास दाखवण्याचं कारण म्हणजे जाहीर केलेला लाभांश. कंपनीने प्रति शेअर १.५० रुपयांचा लाभांश जाहीर केला असून, त्याचा थेट फायदा कंपनीचे शेअर धरून ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना होणार आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दीर्घकालीन नफा. गेल्या १० वर्षांत या कंपनीच्या शेअरने जवळपास ९७५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. त्यामुळेच कदाचित आजही अनेकांनी ‘घसरणीनंतरची उसळी’ म्हणून या शेअरकडे वळण्याचा प्रयत्न केला असावा.
जरी आजचा दिवस भारत रसायनसाठी तेजीत गेला असला, तरी तिमाही निकाल पाहता ही वाढ तात्पुरती असेल का, याबाबत बाजारात मतभेद आहेत. आता पुढच्या काही दिवसांत या शेअरची दिशा ठरवणं हे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर आणि कंपनीच्या पुढील आर्थिक कामगिरीवर अवलंबून असेल.