भारताने उंच पर्वतरांगा आणि अवघड हवामानावर मात करत एक असा ऐतिहासिक प्रकल्प हाती घेतला आहे, जो देशाच्या उत्तरेकडील सीमाभागांना वर्षभर जोडून ठेवणार आहे. हा प्रकल्प म्हणजे झोजिला बोगदा, जो आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून नावारूपाला येतो आहे. हा बोगदा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला थेट लडाखशी जोडतो आणि त्याच्या पूर्णत्वामुळे संपूर्ण भागाच्या सामाजिक, आर्थिक, आणि सामरिक दृष्टिकोनातून क्रांती घडवून आणली जाणार आहे.

दरवर्षी हिमवृष्टीमुळे झोजिला खिंड बंद होत असे आणि लडाख भाग काश्मीरपासून तुटून जात असे. यामुळे नागरिकांचे जीवनमान, पुरवठा साखळी आणि पर्यटकांचा प्रवास खंडित होई. परंतु झोजिला बोगद्यामुळे ही समस्या कायमची मिटणार आहे. आता बर्फवृष्टी असो वा पाऊस, श्रीनगर-लेह मार्ग वर्षभर खुला राहील.
कसा असेल हा प्रकल्प?
या बोगद्याचे काम सध्या 70% पूर्ण झाले असून, त्यावर ₹5,500 कोटींचा खर्च होणार आहे. हा एकूण 30 किमीपेक्षा अधिक लांबीचा प्रकल्प आहे ज्यामध्ये मुख्य बोगद्याशिवाय 13 किमी बोगदा आणि 17 किमी जोडमार्गांचा समावेश आहे. याशिवाय 14 इतर लहान बोगदे आणि आधुनिक संरचना देखील या प्रकल्पात अंतर्भूत आहेत.
या बोगद्यामुळे पूर्वी 9 तास लागणारा प्रवास आता फक्त साडेतीन तासांत पूर्ण होईल. विशेष म्हणजे झोजिला खिंड पार करण्यासाठी लागणारा 3 तासांचा वेळ आता 20 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
सैन्यासाठी मोठा फायदा
या बोगद्यामुळे लष्करासाठीही मोठी सोय होणार आहे. संकटाच्या काळात अत्यावश्यक सामग्रीचा पुरवठा, सैन्याचे हालचाल आणि सामरिक प्रतिक्रिया देणे अधिक सुलभ होईल.
झोजिला बोगदा हा घोड्याच्या नालासारखा सिंगल ट्यूब, दोन लेनचा बोगदा आहे. तो हिमालयाच्या झोजिला खिंडीखाली बांधण्यात येतो आहे. बोगदा गंदरबल (काश्मीर) ते द्रास (कारगिल, लडाख) दरम्यान बांधला जात आहे.