रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरात कोणताही त्रास सुरू झाला की, त्याचे परिणाम दीर्घकाळ जाणवत राहतात. मधुमेह म्हणजे असाच एक त्रास, एक मूक शत्रू, जो हळूहळू शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करतो. रक्तातील साखरेची पातळी जर वेळेत नियंत्रणात नाही ठेवली, तर त्याचे परिणाम डोळे, किडनी, नसा आणि हृदयावरही होऊ शकतात. म्हणूनच, मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात अशा नैसर्गिक उपायांचा शोध घेत असतात, जे औषधांशिवाय शरीरावर परिणाम न करता साखर नियंत्रित ठेवू शकतील. याच गोष्टीतून एक महत्त्वाचा उपाय समोर आला आहे, पेरूची पाने.

पेरूची पाने
पेरू हे फळ किती स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते, हे आपल्याला माहिती आहेच. पण त्याच्या पानांचे महत्त्व फार थोड्यांना ठाऊक असते. आयुर्वेदात पेरूच्या पानांना विशेष स्थान आहे. यामध्ये नैसर्गिकपणे आढळणारे घटक रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. विशेषतः यात नॅचरल इन्सुलिनसदृश गुणधर्म असतात, जे शरीरातील ग्लुकोजच्या प्रमाणावर थेट परिणाम करतात.
खाण्याची वेळ आणि पद्धत
सकाळी लवकर, रिकाम्या पोटी जर 3 ते 4 कोवळी पेरूची पाने नीट धुऊन चावून खाल्ली, तर त्याचा प्रभाव साखरेच्या नियंत्रणावर दिसून येतो. तसेच, पानांचा काढा करून प्यायल्यास शरीराला अधिक सहजपणे त्याचे पोषक तत्त्व मिळतात. हा काढा तयार करताना काही पाने 1 ग्लास पाण्यात उकळा आणि कोमट असताना गाळून घ्या. दिवसातून एकदाच, सकाळी याचे सेवन करा. हे घरगुती औषध म्हणून वर्षानुवर्षे अनेक ठिकाणी वापरले जात आहे.
वजनही होते कमी
पेरूची पाने केवळ मधुमेहावर उपयुक्त नाहीत, तर वजन कमी करण्यात, कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि पाचन सुधारण्यातही मदत करतात. त्यामुळे फक्त मधुमेहींनीच नव्हे, तर सामान्य लोकांनीही आपल्या आहारात या पानांचा समावेश करणे फायदेशीर ठरतो.
मात्र, कोणताही नैसर्गिक उपाय सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते.