दुकान उघडताना किंवा त्याची रचना करताना आपण अनेक गोष्टी लक्षात घेतो. ग्राहक कसा येईल, जागा किती मोकळी वाटेल, सजावट कशी करावी, इत्यादी. पण अनेकदा दुर्लक्ष केलं जातं ते म्हणजे वास्तुशास्त्र. विशेषतः दुकानाच्या पायऱ्यांची दिशा आणि रचना ही अशी बाब आहे, जी ग्राहकांच्या आकर्षणापासून ते आर्थिक वृद्धीपर्यंत अनेक गोष्टींवर प्रभाव टाकू शकते. वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी पायऱ्या बांधल्यास, दुकानात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि व्यवसाय सतत वाढत राहतो.

पूर्वेकडील दुकान
जर तुमच्या दुकानाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असेल, तर वास्तुशास्त्र सांगते की पायऱ्या ईशान्य कोपऱ्यात असाव्यात. ही दिशा केवळ शुभच नाही, तर सकारात्मक उर्जेचा स्रोत मानली जाते. यामुळे दुकानात सातत्याने नवीन ग्राहक येण्याची शक्यता वाढते आणि आर्थिक स्थैर्य लाभते. पायऱ्या शक्यतो संपूर्ण लांबीच्या असाव्यात, म्हणजे त्या सौंदर्यदृष्ट्याही चांगल्या दिसतात आणि उर्जेचा प्रवाहही सुरळीत राहतो.
पश्चिम दिशेतील दुकान
पश्चिमाभिमुख दुकानांबाबत बोलायचे झाल्यास, पायऱ्यांसाठी वायव्य कोपरा सर्वात योग्य मानला जातो. जर ही जागा उपलब्ध नसेल, तर दुकानाच्या मध्यभागी एक उंचवटा करून त्यावरून पायऱ्या वायव्य दिशेकडे नेण्याची शिफारस केली जाते. यामुळे व्यापारात स्थिरता आणि वाढ अनुभवता येते. काही वास्तु तज्ज्ञ सौंदर्यवर्धनासाठी चंद्रकोराच्या आकारातील पायऱ्यांचा सल्लाही देतात, ज्यात वास्तुशास्त्र आणि डिझाइनचा सुंदर समन्वय साधता येतो.
उत्तरमुखी दुकान
जर तुमचे दुकान उत्तरमुखी असेल, तर पायऱ्या ईशान्य दिशेने असणे शुभ मानले जाते. उत्तरेच्या दिशेने उर्जा प्रवाह जास्त असतो आणि त्या उर्जेला सहकार्य करण्यासाठी पायऱ्या योग्य स्थानावर असणं आवश्यक असतं. वायव्य कोपऱ्यापासून सुरुवात करून ईशान्य दिशेपर्यंत पायऱ्या लांबविल्यास व्यवसायात फायदे होतात, असे मानले जाते.
दक्षिणाभिमुख दुकान
तसेच, दक्षिणाभिमुख दुकानासाठी पायऱ्यांचे स्थान हे आग्नेय कोपऱ्यात असणे योग्य ठरते. ही दिशा उष्णतेचे आणि क्रियाशीलतेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे इथे योग्य रचनेत पायऱ्या बांधल्यास, दुकानात स्थिर उत्पन्न आणि तेजस्वी वातावरण तयार होऊ शकते. अगदी मध्यभागी चंद्रकोराच्या पद्धतीने पायऱ्या असल्या, तरी त्या व्यवसायास अनुकूल ठरू शकतात.
अर्थातच, हे सर्व नियम वास्तुशास्त्रीय मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहेत. प्रत्येक दुकानाची रचना, स्थान, परिसर आणि व्यापारी उद्दिष्ट वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे अशी कोणतीही महत्त्वाची रचना करताना वास्तु तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते.