भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी राजांची नावे घेतली जातात, पण काहींच्या कथा इतक्या प्रेरणादायी असतात की त्या काळाच्या पल्याड जाऊन आजही मनात घर करतात. अशाच एका अपराजित योद्धा सम्राटाची गोष्ट म्हणजे राजा समुद्रगुप्त. त्याने केवळ युद्धं जिंकली नाहीत, तर आपल्या स्वभावाने, उदारपणाने आणि शौर्याने लोकांची मनंही जिंकली. एकही लढाई न हरलेला हा राजा केवळ एक विजेता नव्हता, तर तो आपल्या प्रत्येक विजयामागे एक व्यापक दृष्टी घेऊन चालणारा नेतृत्वकर्ता होता.

राजा समुद्रगुप्त
समुद्रगुप्त, चंद्रगुप्त पहिला आणि राणी कुमारदेवी यांचा मुलगा, गुप्त राजवंशाचा चौथा शासक होता. इ.स. 335 ते 375 या काळात त्याने भारतावर राज्य केलं. तो पाटलीपुत्र (सध्याचे पाटणा) येथून आपले प्रशासन चालवायचा. त्याचा काळ गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो. इतकं प्रबळ आणि प्रभावशाली साम्राज्य त्याने उभं केलं होतं की त्याच्या तोडीचा राजा त्या काळात भारतात नव्हताच.
इतिहासकार सांगतात की समुद्रगुप्ताने आपल्या कारकीर्दीत 200 पेक्षा अधिक लढाया लढल्या आणि त्यात तो एकदाही पराभूत झाला नाही. त्याची रणनिती, नेतृत्वगुण, आणि सैनिकांमधील आत्मविश्वास यामुळे तो अपराजित राहिला. पण समुद्रगुप्त केवळ तलवारीनेच लढत नव्हता, तर त्याच्या धोरणांमधूनही त्याचा उदार विचार दिसत असे. ज्या राजांनी त्याच्याविरोधात बंड केलं, त्यांची राज्ये त्याने आपल्या साम्राज्यात विलीन केली. पण जे पराभूत झाले तरी त्याच्याशी मैत्री राखत होते, त्यांना त्याने त्यांचं राज्य परत देऊन केवळ कर भरण्याची अट ठेवली. त्याच्या या उदार वागणुकीमुळेच अनेक राज्यांनी त्याचं वर्चस्व स्वेच्छेने स्वीकारलं.
समुद्रगुप्तचे साम्राज्य
समुद्रगुप्ताची लढाई केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती. त्याने बंगाल, आसाममधील समतत आणि कामरूपसह नेपाळ, कार्तीपूर आणि दक्षिण भारतातली अनेक राज्ये आपल्या साम्राज्यात समाविष्ट केली. इतकंच नव्हे तर शक आणि कुशाणांसारख्या बाह्य शक्तींवरही आपला प्रभाव गाजवला. प्रयाग प्रशस्तीमध्ये त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करताना लिहिलं आहे की त्याच्याशी संपूर्ण पृथ्वीवर कोणी तुलना करू शकत नव्हतं. त्याने संपूर्ण भारताला एका साम्राज्याखाली आणण्याचं धाडस केलं आणि त्यात तो यशस्वीही ठरला.
समुद्रगुप्त केवळ लढवय्या नव्हता, तो धर्मशील, दानशूर आणि विद्वान राजा होता. त्याने लाखो गायींचं दान केलं, अश्वमेध यज्ञ पार पाडला आणि वैदिक परंपरेचा सन्मान राखला. त्याचं आंतरराष्ट्रीय महत्त्वही लक्षणीय होतं. श्रीलंकेच्या मेघवर्ण या राजाने त्याच्याशी मैत्रीची भावना ठेवत बोधगया येथे बौद्ध मठ उभारण्यासाठी परवानगी मागितली, आणि भेटवस्तू पाठवल्या. ही गोष्ट त्या काळात समुद्रगुप्ताचा परदेशी राजांवर असलेला प्रभाव दर्शवते.
समुद्रगुप्त हा भारतातल्या त्या थोर योद्धा राजांपैकी एक होता, ज्याने तलवार, तत्व, आणि उदारमतवादाच्या जोरावर अपराजेय इतिहास घडवला. तो केवळ राज्यांचा सम्राट नव्हता, तो लोकांच्या हृदयांचा सम्राट होता.