कॉर्पोरेट जगात यशाचं शिखर गाठल्यानंतर अनेक जण आपल्या पुढच्या पायरीचा विचार करतात काहीजण नवी कंपनी सुरू करतात, काहीजण सल्लागार बनतात, तर काहीजण निवृत्तीचं निवांत जीवन जगतात. पण रिलायन्स इंडस्ट्रीजचे माजी उपाध्यक्ष आणि मुकेश अंबानी यांचे अत्यंत जवळचे सहकारी प्रकाश शाह यांनी एक असं वळण घेतलंय,

ज्याने सगळ्यांनाच चकित केलं. करोडोंच्या संपत्तीवर पाणी सोडत त्यांनी भिक्षू बनण्याचा निर्णय घेतलाय एक असा निर्णय, जो बाहेरून अचानक वाटू शकतो, पण त्यामागे खोल अंतर्मनाचा शोध लपलेला आहे.
प्रकाश शाह हे केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजमधील एक वरिष्ठ अधिकारी नव्हते, तर त्या घराण्याच्या काही अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये त्यांचा ठसा होता. त्यांनी जिथे हात घातला, तिथे प्रगती घडली. पण आज, त्यांनी ही यशस्वी कारकीर्द मागे टाकून एक साधं, आणि पूर्णतः त्यागमय जीवन स्वीकारलंय. त्यांनी केवळ आपल्या लाखो रुपयांच्या पगाराची आणि कॉर्पोरेट सत्तेचीच नव्हे, तर जगाच्या सर्व सोयीसुविधांचाही त्याग केला आहे.
या निर्णायक वळणात विशेष असं म्हणजे, त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासात सहभागी झाल्या आहेत. नैन शाह यांनीही सांसारिक जीवन सोडून पतीसोबत दीक्षा घेतली आहे.
आता हे दोघंही पारंपरिक पांढऱ्या वस्त्रांमध्ये, अनवाणी चालत, अगदी किमान वस्तूंसह जगण्याचं उदाहरण उभं करत आहेत. त्यांचं आयुष्य पाहिलं, की मनात एकच विचार येतो खरंच, माणूस कोणत्या क्षणी आपल्या आतल्या शांततेच्या शोधात सर्व काही मागे टाकेल, याचा नेम नाही.
या परिवर्तनामागचं कारण काही क्षणात घडलेलं नाही. शाह यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून ते जैन तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट झाले होते. ध्यान, वैराग्य, आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची ओढ त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. ते कुठल्याही गोष्टींपासून हटकलं नाहीत मोबाईल, गाडी, बँकेतील पैसे… सगळं मागे ठेवलं आणि एक नवीन जीवनाची वाट चालायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर सध्या त्यांच्या नवीन रूपाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. पूर्वी जे व्यक्तिमत्त्व टाय-कोटमध्ये बोर्डरूममध्ये झळकत असे, तेच आज साध्या वस्त्रात, शांत डोळ्यांनी अनवाणी चालताना दिसतं. या छायाचित्रांमधून एक वेगळीच उर्जा झळकते – पैसा, सत्ता, किंवा प्रसिद्धीपेक्षा खोल, अंतर्यामी समाधानाची.
शिक्षण, बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता या बाबतीत शाह यांचं वर्चस्व स्पष्ट आहे. आयआयटी बॉम्बे सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून केमिकल इंजिनिअरिंगचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं, त्यानंतर त्यांनी पेटकोक मार्केटिंगपासून ते जामनगरच्या गॅसिफिकेशन प्रकल्पापर्यंत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
पण आज, त्यांची खरी ओळख ही आहे एका अशा व्यक्तीची, ज्याने ‘यश’ या शब्दाला नव्यानं अर्थ दिला आहे. त्यांच्या निर्णयाने अनेकांना विचार करायला लावलंय आपण आपल्या आयुष्यात खरंच काय शोधतोय? प्रसिद्धी, पैसा, की अंतर्मनाची शांती?