भारताच्या विविधतेने भरलेल्या सामाजिक परंपरांमध्ये काही प्रथा इतक्या अनोख्या आणि आश्चर्यकारक आहेत की त्यांच्याबद्दल ऐकून आपण क्षणभर थांबून विचार करू लागतो. आपल्याला एरवी लग्न म्हटल्यावर आठवते ती वराची मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि नवरीला तिच्या घरच्यांचा अश्रूंनी निरोप देण्याचा क्षण. पण भारतातल्या मेघालय राज्यात असा एक समाज आहे जिथे ही सगळी साखळी उलटीच चालते,इथे नवरी वरात घेऊन वराच्या घरी पोहोचते आणि लग्नानंतर नवऱ्यालाच निरोप दिला जातो.

खासी समुदाय
हा समाज म्हणजे खासी समुदाय. मेघालयातील सुमारे 25 टक्के लोकसंख्या या समुदायाची आहे. या समाजात महिला केंद्रस्थानी असते. तिची भूमिका केवळ घरातच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लग्नाच्या दिवशी मुलगी आपल्या कुटुंबासह वरात घेऊन वराच्या घरी पोहोचते आणि विधी झाल्यानंतर वराला तिच्या घरी घेऊन जाते. हे दृश्य पाहणाऱ्याला एक क्षण सगळं उलटं वाटेल, पण इथे ही प्रथा अभिमानाने पाळली जाते.
खासी समाजात ‘मॅट्रीलाइनिअल’ म्हणजेच मातृसत्ताक रचना आहे. मुलगा लग्नानंतर आपल्या घरी न राहता पत्नीसोबत तिच्या घरात राहतो. पतीकडील नातेवाईकांना हे सामान्य वाटतं, कारण इथल्या परंपरेनुसार महिला घराची मुख्य जबाबदारी सांभाळतात. यामुळे मुलींच्या जन्मानंतर उत्सव साजरे केले जातात. जेथे भारतात अजूनही काही भागात मुलगी जन्माला येणं दु:ख समजलं जातं, तिथे खासी समाजात तो आनंदाचा क्षण मानला जातो.
महिलांना मिळतात अनेक हक्क
याच समाजात अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे मालमत्तेवर मुलीचा पहिला हक्क असतो. आईच्या संपत्तीचा वारसदार मुलगा नसून मुलगी असते. मुलगीच घराची मालकीण मानली जाते आणि तीच आपले आई-वडील, आजी-आजोबा यांची जबाबदारी पार पाडते.
खासी समाजाची भाषा ‘खासी’ ही आहे, जी ऑस्ट्रो-एशियाटिक भाषाकुळात मोडते. त्यांच्या संस्कृतीत पारंपरिक नृत्य, लोकगीते आणि रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख महत्त्वाचे घटक आहेत. त्यांचा सण-उत्सव, लग्नविधी आणि जीवनशैली ही स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून विकसित झालेली आहे.
केवळ खासीच नव्हे, तर मेघालयातील गारो आणि जैंतिया या दोन प्रमुख जमातींतही अशीच मातृसत्ताक व्यवस्था आहे. त्या सर्वच समुदायांमध्ये महिलांचा सन्मान, त्यांची जबाबदारी आणि त्यांची निर्णयक्षमता मोठ्या अभिमानाने स्वीकारली जाते.