अहिल्यानगर, दि.२५ – आणीबाणी लागू होऊन ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर आयोजित या प्रदर्शनास आणीबाणी बंदिवान, त्यांचे नातेवाईक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला २५ जून २०२५ रोजी ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील आणीबाणी बंदिवानांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते-नागरिकांची छायाचित्रे व माहितीचा समावेश करण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या आणीबाणी बंदिवान व त्यांच्या पत्नी अशा एकूण १३३ जणांना शासनाकडून मानधन दिले जात आहे. यापैकी ४५ जणांकडून उपलब्ध माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.

प्रदर्शनातून आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्ष आणि त्याचे विविध पैलू प्रभावीपणे सादर करण्यात आल्यामुळे बंदिवास भोगलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले व शासनाचे आभार मानले.आणीबाणीच्या काळात जिल्ह्यातील अनेक बंदिवासी १ महिन्यापासून ते १९ महिन्यापर्यंतच्या कारावास भोगला. या सर्व बंदिवासांच्या कार्याला प्रदर्शनातील विविध फ्लेक्स, बोर्ड व स्टँडी यांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला होता.
प्रदर्शनाच्या मध्यवर्ती ठिकाणी ठेवलेला सेल्फी पॉईंट अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी हेरंब आवटी, रविंद्र कुलकणी, अविनाश आपटे, सुरेश बब, सुभाष कोते, बाबूराव पुरोहीत, विजयराव जोशी असे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक उपस्थित होते.प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष मांडणीपर्यंतचे सविस्तर विवेचन उपस्थित मान्यवरांना दिले.
लोकसहभागासाठी खुले निमंत्रण
या प्रदर्शनाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पुढील काही दिवस खुले राहणार आहे.