अहिल्यानगर हादरलं! जुन्या वादातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने धारदार शस्राने १० वीच्या विद्यार्थ्यांवर शाळेतच हल्ला करत केला खून

क्रिकेट खेळण्याच्या वादातून आठवीच्या विद्यार्थ्याने सुटीच्या वेळी शाळेतच दहावीतील विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून खून केला. जुना वाद कारणीभूत ठरला. आरोपी मुलगा ताब्यात असून, घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षणक्षेत्र आणि समाजमन हादरले आहे. आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुटीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. ही घटना क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून घडल्याचे समोर आले आहे. 

घटनेचा तपशील

ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अहिल्यानगरमधील एका शाळेत घडली. दहावीत शिकणारा मयत विद्यार्थी त्या दिवशी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेसाठी शाळेत आला होता. परीक्षा संपल्यानंतर शाळा दुपारी भरली होती. मधल्या सुटीच्या वेळी काही विद्यार्थी खेळत होते, तर काहीजण डबा खात होते. याचवेळी आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या पोर्चमध्ये मयत विद्यार्थ्यावर चाकूने पोटात आणि डोक्यावर वार केले. या हल्ल्यात मयत विद्यार्थी रक्तबंबाळ झाला आणि त्याला तातडीने शिक्षकांनी दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मयत विद्यार्थ्याचे वडील दुचाकी दुरुस्तीचे काम करतात. त्यांना एका नागरिकाने मुलाच्या जखमी अवस्थेची माहिती दिली. आई-वडील शाळेत आणि नंतर रुग्णालयात धावले, पण त्यांना आपल्या मुलाला मृतावस्थेत पाहण्याची वेळ आली.

जुन्या वादाचे मूळ

मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत या खुनामागील कारण स्पष्ट झाले आहे. मयत विद्यार्थी आपल्या सासूच्या घरासमोर क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. यावरून त्या परिसरातील एका कुटुंबाशी त्यांच्या कुटुंबाचा वाद झाला होता. हे कुटुंब वारंवार मयतच्या घरी भांडणासाठी येत असे आणि “तुमच्या मुलाला समजावून सांगा, नाहीतर आम्ही त्याला जीवंत सोडणार नाही,” अशा धमक्या देत होते. यासंदर्भात मयतच्या कुटुंबातील बहिणीने २०२४ मध्ये तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. या जुन्या भांडणाच्या रागातूनच आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हा हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिस कारवाई 

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन आरोपीला आणि त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले. आरोपी विद्यार्थी घटनेनंतर शाळेतच थांबला होता, तर त्याचे पालकही शाळेत दाखल झाले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आठवीत शिकणाऱ्या या मुलाकडे चाकू कुठून आला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर मयताच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय आणि तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. शाळेचे शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यावर उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली, पण त्यापूर्वीच सर्व काही संपले होते.

मयत विद्यार्थ्याची पार्श्वभूमी

मयत विद्यार्थी हा शाळेत अभ्यासात हुशार होता. तो बुद्धिबळासह विविध खेळांमध्ये सहभागी होत असे. शिक्षकांनी सांगितले की, तो एक शांत आणि मेहनती विद्यार्थी होता. त्याच्या अकाली मृत्यूने शिक्षक आणि सहपाठी हादरले आहेत. संस्थाचालकांनी घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेने शालेय वातावरणावर गंभीर परिणाम झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!