पुणेकरांसाठी खुशखबर ! पुण्यात येणार आणखी दोन मेट्रो, प्रवासात मोठा बदल

Published on -

पुणे शहर दिवसेंदिवस वाढतंय, बदलतंय आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहे आपली मेट्रो. पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला वेग देण्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा आता आणखी विस्तार होणार असून, केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे पूर्व आणि पश्चिम पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्याची संधी मिळणार आहे आणि हो, प्रवासातला वेळही बऱ्याच अंशी वाचणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या विस्तारित टप्प्याला अधिकृत मंजुरी दिली आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली किंवा विठ्ठलवाडी हे दोन नवीन मेट्रो मार्ग असून. याआधी महाराष्ट्र सरकारने या मार्गांना मंजुरी दिली होती, आणि केंद्र सरकारकडून होणाऱ्या अंतिम होकाराची पुणेकर वाट पाहत होते. आता ती प्रतिक्षा संपली आहे.

या नवीन विस्तारात वनाझ ते चांदणी चौक हा अंदाजे १.२ किमी लांबीचा मार्ग असेल, ज्यामध्ये कोथरूड पीएमटी डेपो आणि चांदणी चौक ही दोन थांबे असतील. दुसरीकडे, रामवाडी ते वाघोली पर्यंतचा मार्ग ११.६३ किमीचा असून त्यावर ११ स्थानकं प्रस्तावित आहेत.

खर्डी बायपास, वाघोली आणि विठ्ठलवाडी सारख्या द्रुतगतीने वाढणाऱ्या भागांना यामुळे मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल. संपूर्ण प्रकल्पाची लांबी सुमारे १२.७५ किमी असेल आणि त्यामध्ये एकूण १३ स्थानकं उभारली जातील

या विस्तारासाठी सुमारे ३,७५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, ज्यात केंद्र व राज्य सरकारचा वाटा जवळपास समान आहे. राज्य सरकारने मार्च २०२४ मध्ये आपला हिस्सा महामेट्रोलाच देण्याला मंजुरी दिली असून, हा निर्णय आता प्रत्यक्ष कृतीत उतरतो आहे.

ही मेट्रो लाईन म्हणजे शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. कोथरूड, चांदणी चौक, खराडी, बावधन आणि वाघोली तील नागरिकांचा मेट्रोशी थेट संबंध येणार असल्याने, पुणेकरांचा प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.

अनेकांना यामुळे आपल्या रोजच्या प्रवासाचा मार्गच बदलेल विशेषतः जे ऑफिससाठी किंवा कॉलेजसाठी या भागांत जातात.या प्रकल्पाचं काम पूर्ण व्हायला सुमारे चार वर्षं लागतील. पण एकदा मार्ग सुरू झाला की प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढेल, असा अंदाज आहे.

२०१७ मध्ये या मार्गावर सुमारे ९६ हजार प्रवासी होते, तर २०३७ मध्ये ही संख्या २ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. २०५७ पर्यंत हीच संख्या ३.५ लाखांच्या आसपास पोहोचेल, असा अंदाज आहे.महा-मेट्रो या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी पार पाडणार असून सिव्हिल, इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि अन्य आवश्यक कामं यांचंही नियोजन करण्यात आलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!