14,500 फुटांवर यशस्वी चाचणी! भारताची पहिली AI गन अंधारातही ओळखेल शत्रू, कमाल तंत्रज्ञान पाहून चीनही झाला गार

Published on -

हायटेक युद्धाच्या दिशेने भारतीय लष्कर एक मोठं पाऊल टाकत आहे. पारंपरिक युद्धाच्या संकल्पना मागे टाकत, आता भारतात अशी यंत्रणा तयार झाली आहे जी सैनिकाच्या अनुपस्थितीतही युद्धभूमीवर धोकादायक निर्णय घेऊ शकते. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम मशीन गन नेगेव एलएमजी आता प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये उतरली असून, ती शत्रूची हालचाल ओळखून स्वतःहून गोळीबार करू शकते.

बेंगळुरूस्थित संरक्षण कंपनी BSS ने ही अत्याधुनिक मशीन गन विकसित केली आहे, जी 7.62×51 मिमी बॅरलसह सुसज्ज आहे. 1 ते 8 जून 2025 या कालावधीत पूर्व हिमालयातील 14,500 फूटांपेक्षा अधिक उंचीवर तिची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी केवळ यशस्वी झाली नाही, तर शस्त्राच्या क्षमतेबाबत आश्चर्यकारक परिणामही दाखवले गेले.

Negev LMG मशीन गनची खासियत

या मशीन गनची खासियत म्हणजे तिला सैनिकाच्या फिजिकल उपस्थितीची गरज भासत नाही. एकदा योग्य ठिकाणी तैनात केल्यानंतर, ही गन तब्बल 21 दिवसांपर्यंत बंकरमध्ये निरंतर कार्य करू शकते. केवळ यंत्रणा रिमोट कंट्रोलवर चालवली जात नाही, तर ती स्वयंचलितपणे “मित्र” आणि “शत्रू” यात फरक करू शकते, हे क्षणात घडतं आणि गोळीबारही तेवढ्याच अचूकतेने होतो.

चाचणीत ही गन 300 मीटरपर्यंत लक्ष्य ट्रॅक करू शकली आणि 600 मीटरपर्यंत अचूक फायरिंग केलं. तिची कमाल फायरिंग रेंज 1 किलोमीटरपर्यंत आहे. पण इतकंच नाही ही AI प्रणाली धुके, बर्फ, अंधार किंवा कमी प्रकाश अशा कोणत्याही वातावरणात कार्यक्षम राहते. यामागे आहे मल्टी-स्पेक्ट्रल सेन्सर फ्यूजन-थर्मल आणि ऑप्टिकल तंत्रज्ञान ज्यामुळे कोणतीही हालचाल, सावली किंवा संशयास्पद कृती लगेच ट्रॅक करता येते.

विशेष म्हणजे चाचणीदरम्यान ही मशीन गन हलणाऱ्या सावल्यांवर नजर ठेवत होती. तिने कोणत्याही प्रकारचा धोका आहे का, हे स्वतःहून तपासलं. त्यानंतर ‘ड्राय रन फायरिंग’ प्रोटोकॉल देखील पूर्ण केला, तेही ऑपरेटरच्या कोणत्याही थेट इनपुट शिवाय.

भारतीय लष्करात लवकरच होणार सामील?

ही मशीन गन इस्रायली बनावटीच्या नेगेव एलएमजीवर आधारित आहे, मात्र भारतात यामध्ये अत्याधुनिक AI प्रणाली एकत्रित करण्यात आली आहे. ही प्रणाली शत्रूच्या हल्ल्यापासून सैनिकाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने एक गेमचेंजर ठरू शकते.

जर लवकरच ही गन प्रत्यक्ष भारतीय लष्करात सामील झाली, तर दहशतवाद्यांना आणि घुसखोरांना तोंड देणं अधिक कठीण होईल. कारण ही मशीन गन केवळ आदेशाची वाट पाहत नाही ती स्वतः निर्णय घेते आणि शत्रूला रोखते. ही प्रगती केवळ युद्धतंत्रज्ञानाचं नव्हे, तर भारताच्या स्वयंपूर्ण लष्कर दृष्टिकोनाची झलकही देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!