Maharashtra FYJC Admission : राज्यातल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा विद्यार्थ्यांना गुणांच्या गोंधळामुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण सिस्टीममध्ये चुकीचे दाखवले जात आहेत आणि मूळ गुणांपेक्षा जास्त दिसत आहेत. दुरुस्ती केल्यानंतरही सॉफ्टवेअरमध्ये मूळ आणि सुधारित दोन्ही गुण दिसत असल्याने पालक आणि विद्यार्थी गोंधळलेले आहेत. आणि या गोंधळाचा थेट फटका मेरिट लिस्टवर पडण्याची शक्यता आहे.
एका सॉफ्टवेअर मुळे गोंधळ
या गडबडीत एक विचित्र गोष्ट घडतेय काही विद्यार्थ्यांचे गुण मूळ ५०० पैकी असताना सिस्टीममध्ये ते १००० पैकी दाखवले जात आहेत. परिणामी टक्केवारीसुद्धा चुकीची लागतेय. यामुळे खरे आणि योग्य गुण भरलेले विद्यार्थी मागे पडू शकतात, तर चुकीचे गुण दाखवले गेलेले अर्ज पुढे जाऊ शकतात. अशा परिस्थितीत मुलांचे भविष्य केवळ एका सॉफ्टवेअरच्या चुकांवर लटकतंय, ही बाब काळजीची आहे.

सिस्टीममध्ये गोंधळ कायम
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे लक्षात आल्यावर थेट विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली. काहींनी अर्ज सुधारण्यासाठी विनंती केली, आणि त्याला परवानगीही मिळाली. पण अजूनही सिस्टीममध्ये गोंधळ कायम आहे. एकाच अर्जात सुधारित आणि मूळ दोन्ही गुण दाखवल्याने कोणीच ठामपणे सांगू शकत नाही की अंतिम गणना कशावरून होणार.
संपूर्ण व्यवस्थेतील हलगर्जीपणा
एक मोठी अडचण म्हणजे तक्रार नोंदवायला मदत कक्ष आहेत, पण निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. शिक्षण संचालक कार्यालयाकडेच सर्व अधिकार असल्यामुळे, स्थानिक कार्यालय मदत करू इच्छित असूनही काही करू शकत नाही. त्यामुळे पालकांना वाटतेय की, ही तांत्रिक अडचण नाही, तर संपूर्ण व्यवस्थेतील हलगर्जीपणाच आहे.
एक पालक म्हणाले, “माझ्या मुलाने सीबीएसई बोर्डातून परीक्षा दिली. सुरुवातीला गुण चुकले होते, मग आम्ही सुधारणा केली. पण आता सिस्टीममध्ये दोन्ही गुण एकत्र दिसत आहेत. उद्या यामुळे अर्ज बाद झाला, तर जबाबदार कोण?
शिक्षण क्षेत्रातील काही जाणकार अधिकारीही आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, एकाच विद्यार्थ्याचे दोन प्रकारचे गुण सिस्टीममध्ये असावेत, हीच गोष्ट प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. एकसंध आणि स्पष्ट नियम हवेत. ‘अंतिम गुण’ म्हणजे नेमकं काय, हे सॉफ्टवेअरमध्येही स्पष्ट असायला हवं.
अशा चुका जर लवकर सुधारल्या नाहीत, तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार जागा मिळणार नाही. त्यामुळे पालक संघटना, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनेक विद्यार्थी एकच मागणी करत आहेत सॉफ्टवेअरमधील त्रुटी तातडीनं दूर करा आणि सर्व मंडळांसाठी समान व अचूक गुणनोंदणीची पद्धत राबवा.