एखाद्या कलाकाराने आपल्या आयुष्यात शेकडो भूमिका साकारल्या असतील, रसिकांची मने जिंकली असतील आणि मोठमोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करूनही अखेरच्या टप्प्यावर मात्र एकाकीपणा, आर्थिक अडचणी आणि दुर्लक्षितपणा अनुभवावा लागला तर ती गोष्ट मनाला खोलवर चटका लावणारी ठरते. सतीश कौल यांची कहाणी ही अगदी अशाच हृदयद्रावक वळणांनी भरलेली आहे.

एकेकाळी ज्यांना “पंजाबी चित्रपटसृष्टीचे अमिताभ बच्चन” म्हटले जायचे, ज्यांनी हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये 300 पेक्षा अधिक चित्रपटांत काम करून लोकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं, त्यांचं आयुष्य शेवटी एका वृद्धाश्रमात शांतपणे संपलं, हे ऐकून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. ‘महाभारत’ मालिकेमधील इंद्रदेवाची त्यांची भूमिका लोकांच्या स्मरणात आजही ताजी आहे.
सतीश कौल यांची कहाणी
सतीश कौल यांचा जन्म 8 सप्टेंबर 1946 रोजी झाला. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमी आणि पंजाबी सिनेमातून झाली. त्यांचे सस्सी पुन्नू, इश्क निमाना, सुहाग चुडा आणि पटोला यांसारखे चित्रपट आजही प्रेक्षक आठवतात. देव आनंद, दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. अभिनयक्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी 2011 मध्ये त्यांना PTC पंजाबी फिल्म अवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
पण प्रसिद्धीचा हा प्रवास पुढे मात्र अंधाराच्या दिशेने गेला. 2015 मध्ये झालेल्या अपघातात त्यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना जवळपास दोन वर्षे अंथरुणावर राहावं लागलं. यातून त्यांची आर्थिक स्थिती खालावली आणि कामही मिळेनासं झालं.
लॉकडाऊनमध्ये मृत्यू
पुढे 2020 मध्ये लॉकडाऊनने त्यांच्या स्थितीला अजून मोठा झटका दिला. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांच्याकडे औषधं, अन्नधान्य आणि गरजेच्या गोष्टींसाठी पैसे नाहीत. त्यांनी सिनेसृष्टीतील लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं, परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना लुधियानामधील एका वृद्धाश्रमात राहावं लागलं.
2021 मध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण 10 एप्रिल रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या बहिणीने त्यांच्या निधनानंतर सांगितलं की, सतीश शेवटी केवळ आजारपणाशीच नव्हे, तर उपेक्षेशीही लढत होते.