चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत कलाकारांचे हसू, डोळ्यांतले अश्रू, त्यांच्या वाट्याला येणारी वाहवा हे सगळं आपल्याला पडद्यावर दिसतं. पण त्या पडद्यामागे काय असतं, ते फार कमी लोकांना कळतं. मधुबाला या नावामागे फक्त सौंदर्य नव्हे, तर एक असामान्य वेदना आणि बलिदानाची कथा आहे. विशेषतः ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटातल्या एका दृश्यासाठी तिने घेतलेला जीवघेणा निर्णय.

‘मुघल-ए-आझम’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नव्हता, तर एक युग होता. दिग्दर्शक के. आसिफ यांच्या कल्पनेतल्या या भव्य प्रकल्पात सर्व काही वास्तव वाटावं, ही त्यांची तडफड होती. त्यासाठी त्यांनी 16 वर्षे मेहनत घेतली आणि त्या प्रवासात मधुबालानेही स्वतःचा जीव पणाला लावला.
‘मुघल-ए-आझम’मधील ‘तो’ सीन
चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणजे अनारकलीला सम्राट अकबराने दिलेली शिक्षा, तिला साखळदंडात बांधून बर्फासारख्या थंड पाण्यात उभं केलं जातं. या दृश्यात के. आसिफला भावनांचा खोल वेध घ्यायचा होता. प्रेक्षकांनी मधुबालाच्या चेहऱ्यावरून आणि हालचालींतून तिची वेदना अनुभवावी, हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी प्रत्यक्ष शूटिंगवेळी वापरलेलं पाणी अत्यंत थंड होतं, इतकं की शरीर सुजून जाईल.
पण हा फक्त अभिनय नव्हता, हे खरे दुःख होतं. कारण मधुबालाला तेव्हा आधीपासूनच हृदयविकार होता. तिच्या हृदयात छिद्र होते व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला होता. शरीर अशक्त होतं, फुफ्फुसांवर ताण होता. पण एक कलाकार म्हणून तिने भूमिका जगली. तिने थांबण्याचा विचारही केला नाही.
चित्रपटानंतर बिघडली मधुबालाची तब्येत
त्या थंड पाण्यात उभं राहताना तिच्या पायांना सूज आली, अंग थरथर कापत होतं, पण तिने कधीही सेटवर तक्रार केली नाही. तिची तब्येत त्या सीननंतर बिघडली, पण तरीही तीचं धैर्य ढळलं नाही.
‘मुघल-ए-आझम’ प्रदर्शित झाला 1960 मध्ये. त्याने तांत्रिकदृष्ट्या आणि कलात्मकदृष्ट्या इतिहास रचला, पण बऱ्याच लोकांच्या अपेक्षेपेक्षा बॉक्स ऑफिसवर उशिरा यश मिळालं. तरी, त्या दृश्यातली मधुबालाची जीवंत वेदना आजही लोकांच्या मनात कोरली गेली आहे