सूर्यग्रहण निसर्गातील एक अद्भुत आणि आकर्षक घटना आहे. 2025 हे वर्षदेखील अशा एका सुंदर खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहे आणि ती म्हणजे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण. परंतु, यंदाचे हे ग्रहण भारतासाठी काहीसे वेगळे असणार आहे. अनेकांच्या मनात या ग्रहणाबद्दल उत्सुकता असली, तरी यावेळी भारतात ते पाहायला मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे.

कधी लागणार सूर्यग्रहण?
भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 11:00 वाजता सुरू होईल आणि 22 सप्टेंबरच्या पहाटे 3:24 वाजता संपेल. एकूण कालावधी जवळजवळ 4 तास 24 मिनिटांचा असणार आहे. मात्र, ही संपूर्ण वेळ रात्रीच्या अंधारात असल्याने भारतात कुठेही हे दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येणार नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांसाठी या ग्रहणाचा कोणताही दृष्य प्रभाव राहणार नाही.
या ग्रहणाचा प्रभाव ज्या ठिकाणी दिसेल, त्या भागांमध्ये युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांचा समावेश आहे. अटलांटिक महासागर आणि आर्क्टिकच्या काही भागांमध्येही ते आकाशात दिसेल. परंतु भारतात सूर्यग्रहण रात्रीच्या वेळेत असल्याने येथे ना त्याचे दृश्य लाभणार आहे ना त्यासोबत येणारा सुतक काळ लागू होणार आहे.
सुतक काळ म्हणजे?
सुतक काळ म्हणजे ग्रहणाच्या आधीचा आणि नंतरचा काळ, जो धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो आणि त्यात अनेक धार्मिक नियम पाळले जातात. पण शास्त्रानुसार, सुतक फक्त तेव्हाच मान्य असतो जेव्हा ग्रहण प्रत्यक्ष पाहता येते. त्यामुळे यंदा भारतात सुतकही लागू होणार नाही.
पण या दिवशी आणखी एक विशेष संयोग घडणार आहे आणि तो म्हणजे पितृपक्षाचा काल. या काळात पूर्वजांच्या आत्म्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि दान करण्याचे महत्त्व असते. ग्रहणाचा थेट परिणाम भारतावर नसला, तरी या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि गरजूंना अन्न-वस्त्र दान करणे शुभ मानले जाते.