जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण भांडवलाची कमतरता असेल, तर केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकते. ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ म्हणजे PMMY ही योजना विशेषतः अशा तरुणांसाठी आणि महिलांसाठी आहे, जे काहीतरी वेगळं करू इच्छितात, पण आर्थिक अडचणींमुळे थांबले आहेत.

‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’
ही योजना 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झाली. या योजनेचे उद्दिष्ट एकच आहे, भारतातील लघु उद्योगांना, स्टार्टअप्सना आणि महिला उद्योजकांना स्वावलंबी बनवणं. याअंतर्गत, अगदी एखादं किराणा दुकान, फळविक्रेता, रस्त्यावर विक्रेता, शिलाई दुकान, अगदी लघु उत्पादन व्यवसाय करणारा व्यक्तीही या कर्जासाठी अर्ज करू शकतो. आधी ही योजना 10 लाख रुपयांपर्यंत मर्यादित होती, पण आता ही मर्यादा वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.
या योजनेत तीन प्रकारचे कर्ज दिले जाते. शिशु, किशोर आणि तरुण. शिशुमध्ये 50,000 रुपयेपर्यंत, किशोरमध्ये 5 लाखांपर्यंत, आणि तरुण योजनेत 10 लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं. आता ही मर्यादा वाढवून 20 लाख रुपये झाल्याने अधिक मोठ्या व्यवसायासाठी देखील या योजनेंतर्गत मदत मिळू शकते.
हे कर्ज कोण घेऊ शकतं?
या योजनेसाठी कोणत्याही वयाचा, पण किमान 18 वर्षांचा भारतीय नागरिक पात्र आहे. बेरोजगार, महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल, अगदी किरकोळ दुकानदार, फेरीवाले, चालक, सेवा देणारे व्यावसायिक असे सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांसाठी विशेष बाब म्हणजे, जर एखाद्या कंपनीत 50 टक्क्यांहून अधिक आर्थिक भागीदारी महिलांची असेल, तर त्यांना प्राधान्य दिलं जातं.
या योजनेतून तुम्ही व्यवसायासाठी विविध गोष्टींसाठी कर्ज घेऊ शकता. जसं की टॅक्सी, ई-रिक्षा, सलून, गारमेंट शॉप, फूड प्रॉडक्ट तयार करण्याचा उद्योग, औषध दुकान, हॉटेल, क्लिनिक, मशिनरी विकत घेणं, शेतीसंबंधित क्लिनिक आणि अगदी मधमाशीपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठीसुद्धा कर्ज मिळू शकतं.
कर्जासाठी व्याजदर हा EBLR (External Benchmark Lending Rate) वर आधारित असतो आणि त्यावर सुमारे 3.25 टक्के अतिरिक्त व्याज आकारले जाते. 5 लाखांपर्यंतचं कर्ज 5 वर्षांत फेडता येतं आणि त्यासाठी 6 महिन्यांपर्यंत मोरेटोरियम दिलं जातं. 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज फेडण्यासाठी 7 वर्षांचा कालावधी दिला जातो आणि यासाठी 12 महिन्यांचा मोरेटोरियम मिळतो.
कर्जासाठी अर्ज करताना कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही आणि प्रक्रिया शुल्कही अनेकदा शून्य असतं. काही बँका 0.5 टक्के शुल्क घेतात. कर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 7 ते 10 कामकाजाचे दिवस लागतात.
आवश्यक कागदपत्रं
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन, फोटो, व्यवसायाची माहिती असलेला प्रकल्प अहवाल, मागील वर्षांचे बँक स्टेटमेंट आणि आयकर परतावा यांचा समावेश होतो. जेव्हा कर्ज मंजूर होतं, तेव्हा तुम्हाला मुद्रा कार्ड दिलं जातं, जे डेबिट कार्डप्रमाणे वापरता येतं आणि त्याद्वारे तुम्ही ATM मधून पैसा काढू शकता.
म्हणजेच, जर तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची असेल, आणि तुमच्याकडे कल्पना, मेहनतीची तयारी आणि आत्मविश्वास असेल तर आता सरकारकडून तुम्हाला आर्थिक पाठबळही मिळू शकतं.