एका काळी अँग्री हिरोजच्या समोर दहशत निर्माण करणारा, कराटेचा मास्टर, 6 फूट उंच, लांब कुरळ्या केसांचा एक देखणा खलनायक म्हणजे बॉलीवूडचा महेश आनंद. 80-90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर त्याची छाया होती. पण, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर मात्र त्याचं आयुष्य अत्यंत वेदनादायी होतं. झगमगत्या जगतात शेकडो कलाकार येतात, पण काहींचं आयुष्य इतकं दुःखद ठरतं की पडद्यावरचा खलनायक खऱ्या आयुष्यात खूपच हळवा वाटतो.
महेश आनंद

महेश आनंदनं आपल्या 4 दशकांच्या करिअरमध्ये तब्बल 300 चित्रपटांमध्ये भूमिका केली. ‘शहेनशाह’, ‘गुमराह’, ‘तूफान’, ‘कुली नं. 1’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये तो दिसला. अमिताभ बच्चन, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करणारा हा अभिनेता केवळ खलनायक नव्हता, तर तो एक प्रशिक्षित नर्तक, ब्लॅक बेल्टधारक आणि मॉडेलही होता. त्याच्या करिअरची सुरुवात 1984 मध्ये ‘करिश्मा’ या चित्रपटातून झाली होती. मात्र खरी ओळख त्याला ‘शहेनशाह’नंतर मिळाली.
त्याच्या खाजगी आयुष्याची गोष्ट मात्र पडद्यावरच्या भूमिका इतकीच विचित्र होती. त्याने आयुष्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 5 लग्ने केली. पहिलं लग्न रीना रॉयच्या बहिणीशी झालं, दुसरं मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका डिसूझाशी, तिसरं मधु मल्होत्रा, चौथं उषा बचानी आणि शेवटचं लग्न एका रशियन महिलेशी. पण यापैकी कोणत्याच नात्याने त्याच्या आयुष्यात स्थैर्य दिलं नाही. उलटपक्षी, नात्यांनी त्याला एकटं पाडलं.
‘ती’ इच्छाही राहिली अपूर्ण
1990 च्या उत्तरार्धात त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. 18 वर्षांपर्यंत त्याला कुठलंच काम मिळालं नाही. त्यातच त्याच्या सावत्र भावाने त्याच्याकडून 6 कोटी रुपयांची फसवणूक केली. आर्थिक संकट इतकं वाढलं की त्याच्याकडे पिण्याचं पाणीही उरलं नाही. तो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आपलं दुःख मोकळेपणाने व्यक्त करत असे “माझे मित्र मला दारुडे म्हणतात. माझं कुटुंब नाही. मी 300 चित्रपट केलेत, पण माझ्याकडे आता पाणीही नाही.”
तो आपल्या त्रिशूल नावाच्या मुलावर फार प्रेम करत होता. त्याला एक मिठी मारण्याची इच्छा त्याने शेवटच्या काळातही व्यक्त केली होती “मरण्यापूर्वी मला मिठी मार. मी तुला आयुष्यभर प्रेम करत राहीन.” मात्र, ते नातंही पूर्णत्वास गेलं नाही. एकटेपण आणि नैराश्य याने त्याला पोखरत गेलं.
पाचव्या पत्नीने केले अंत्यसंकर
एका चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना लागलेल्या दुखापतीमुळे तो अनेक महिने अंथरुणाला खिळून राहिला. शारीरिक वेदनांनी आणि भावनिक तुटफुटीने त्याचा संपूर्ण आत्मविश्वास ढासळला. शेवटी, 9 फेब्रुवारी 2019 रोजी, मुंबईच्या वर्सोवा भागातील त्याच्या फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला. दोन दिवसांपासून दरवाजा न उघडल्याने मोलकरणीने शंका घेतली, पोलिसांनी दरवाजा तोडला आणि महेश आनंदचे मृत शरीर सोफ्यावर सापडले. बाजूला दारूची बाटली पडलेली होती.
त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. त्याच्या पाचव्या पत्नीने रशियातून येऊन थेट स्मशानात त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले. एक काळ होता, जेव्हा सेटवर त्याचं आगमन होणं म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. पण शेवटी त्याच्यासोबत कुणीच नव्हतं .