शिर्डी- आषाढी वारी हा जगाच्या पाठीवरील एक अद्भूत सोहळा आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर चालून पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा सुखाचा क्षण असल्याची भावना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्री विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमिताने श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे पहाटे दर्शन घेतले. दरवर्षी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी विखे पाटील कुटुंबिय पंढरपूरात जातात. पद्मश्रीं डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून सुरू असलेली ही परंपरा मंत्री विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांनी पुढे सुरू ठेवली आहे.

मनोभावे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. वारीच्या मंगलमयी पर्वाच्या निमिताने शेकडो किलोमीटरचे अंतर चालून पंढरपुरात लाखो भाविकांचे पांडुरंगाच्या श्रध्देपोटी येणे म्हणजे जगाच्या पाठीवरील एक अद्भूत सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. विठ्ठलाच्या समोर नतमस्तक होण्याचे भाग्य मिळणे म्हणजे परमोच्च असा सुखाचा क्षण असतो. प्रत्येकजण यासाठीच पंढरीत येण्यासाठी आसुलेला असतो. सर्व दुःख विसरून माउलीच्या दर्शनातच सुखाचा क्षण लाखो भक्त शोधत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
पंढरपूर येथे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या भक्त निवासात जाऊन मंत्री विखे पाटील यांनी भक्त निवसात उतरलेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेवून व्यवस्थेची पाहणी केली. सर्वच दिंड्यांमधील वारकरी बांधवांनी मंत्री विखे पाटील यांचे स्वागत केले.