संगमनेर- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून ६ हजार ५७० क्यूसेस पाणी सोडण्यात आले असून आगामी काळात पावसाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन युवा काँग्रेसचे अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे.

शासकीय स्तरावरून निळवंडे धरणातून ६ हजार ५७० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून आगामी काळामध्ये हा विसर्ग वाढू शकतो, अशी परिस्थिती आहे. याचबरोबर आढळा आणि भोजापुर धरण सुद्धा भरले आहे. त्यामुळे या नद्यांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता संगमनेर शहरातील नदीकाठचे नागरिक तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे. या नागरिकांच्या मदतीकरता युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तातडीने उपलब्ध असावे, असे सांगताना नदीकाठी असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ हलवावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच नदीकाठी आवश्यक मदत लागल्यास तातडीने यशोधन कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.