अहिल्यानगर- शहरात गेल्या तीन महिन्यांपासून कचरा संकलनाचे नियोजन ढासळले आहे. कुठे आठवडाभर कचरा उचलला जात नाही, तर कुठे नागरिकांना दुर्गंधी, रोगराई आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या तीन महिन्यांपासूनचा कचरा उचलावा अन्यथा घनकचरा कर माफ करावा, अशी मागणी माजी नगरसेवक निखील वारे यांनी सहायक आयुक्त सपना वसावा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले, शहरातील अहिल्यानगर, सावेडी, भोसलेनगर, नागापूर, रेल्वे स्टेशन परिसर, आणि अनेक रहिवासी व व्यावसायिक भागात गेल्या कित्येक आठवड्यांपासून कचरा संकलनासाठी वाहनच आलेले नाही.

नागरिक वारंवार तक्रार करत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. महापालिकेने ज्या एजन्सीकडे कचरा संकलनाचे कंत्राट दिले आहे, त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास स्पष्टपणे अपयशच दर्शवले आहे. या बेजबाबदार कारभारामुळे शहरात दुर्गंधी पसरलेली असून, संपूर्ण नगरचे ‘बकालीकरण’ झालेले आहे.
शहरातील नागरिकांकडून दरवर्षी लाखो रुपयांचा घनकचरा कर वसूल केला जातो, परंतु त्या मोबदल्यात त्यांना कोणतीही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. गेल्या तीन महिन्यांचा घनकचरा कर तात्काळ माफ करण्यात यावा. ज्या भागात नियमितपणे कचरा उचल झाला नाही, त्या भागासाठी विशेष मोहीम राबवून तातडीने स्वच्छता करण्यात यावी. कचरा संकलन पुन्हा पूर्णपणे सुरळीत सुरू होईपर्यंत कोणत्याही नागरिकाकडून घनकचरा कर वसूल करू नये.
कंत्राटी एजन्सीवर दंडात्मक कारवाई करून नवीन व जबाबदार एजन्सी नेमण्याचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. श्स्वच्छ भारत, सुंदर नगर ही संकल्पना फक्त बॅनरपुरती राहू नये, तर ती जमिनीवर उतरली पाहिजे. नागरिकाांचे आरोग्य, सन्मान आणि पैसा या तिन्ही बाबींचा विचार करून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा रोष प्रचंड वाढेल आणि त्याची सर्व जबाबदारी महापालिकेवर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.