अहिल्यानगर- वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत शहरातून जय हिंद फाउंडेशनच्या वतीने वृक्ष फेरी काढण्यात आली. या वृक्ष फेरीमध्ये दहा वाहनांमध्ये १०० वडाची झाडे, वाहनाला तिरंगा ध्वज लाऊन फेरी काढण्यात आली. तर फेरीमधील वडाची झाडे भगवानगड या ठिकाणी लागवडीसाठी रवाना करण्यात आली.
वृक्ष फेरीचा प्रारंभजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते झाला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते, वन विभागचे सहाय्यक वनसंरक्षक जी. पी. मिसाळ, ए. आर. दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, अनिल शेलार, लेखापालन ए. आर. शिरसाट, सुधीर लाड, फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, संभाजी शिरसाठ, सचिन दहिफळे, निळकंठ उल्हारे, अर्जुन आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, पप्पू ढाकणे, म्हातारदेव नेहरकर, किरण ढवळे, वैभव जावळे, संदीप पालवे, अतुल नेटके, भास्कर पालवे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीसाठी जय हिंद फाउंडेशनने घेतलेला पुढाकार दिशादर्शक आहे. देश संरक्षणाच्या कर्तव्यानंतर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माजी सैनिकांचा पुढाकार कौतुकास्पद आहे.
शिवाजी पालवे यांनी जय हिंदच्या माध्यमातून जिल्हाभर वृक्षारोपणाची मोहिम सुरु असून, फक्त झाडे लावून न थांबता ती जगविण्याचे कामदेखील वर्षभर केले जात आहे. अनेक गाव व ओसाड डोंगररांगा, देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.