रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता प्रत्येक कोचमध्ये CCTV, एआय अलर्ट सिस्टम आणि…, प्रवाशांना मिळणार हायटेक सुरक्षा

Published on -

सध्या संपूर्ण देशभरात रेल्वेचा प्रवास हा लाखो लोकांचा दररोजचा भाग बनला आहे. परंतु याच प्रवासात चोरी, खिसेकापू, असभ्य वर्तन आणि सुरक्षेच्या घटना घडत असतात. अशा पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक आणि लोकहिताचा निर्णय घेतला आहे, जो प्रवाशांच्या सुरक्षेला एक नवे वळण देणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली की लवकरच देशातील प्रत्येक रेल्वे कोचमध्ये आणि इंजिनमध्ये हाय-टेक CCTV कॅमेरे बसवले जातील. यामध्ये तब्बल 74,000 कोच आणि 15,000 इंजिन्सचा समावेश असेल. याचा उद्देश म्हणजे प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गुन्हेगारीपासून मुक्त करणे.

या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चोर, खिसेकापू आणि अन्य असामाजिक घटकांवर तात्काळ नियंत्रण ठेवता येईल. उत्तर रेल्वेमध्ये आधीच काही ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली होती आणि त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या कॅमेऱ्यांचा वापर प्रवाशांच्या गोपनीयतेचे पूर्ण भान ठेवून केला जाईल. त्यामुळे कॅमेरे फक्त सामान्य हालचाली असलेल्या जागांवर जसे की दरवाजे, कॉरिडॉर आणि कोचच्या बाहेरील भागावर लावले जातील. प्रत्येक कोचमध्ये अशा काही कॅमेऱ्यांमुळे केवळ चोऱ्या रोखता येणार नाहीत, तर अपघात, अचानक आजार किंवा आणीबाणीच्या प्रसंगी फुटेजच्या आधारे तत्काळ मदत करणे शक्य होईल.

AI अ‍ॅलर्ट सिस्टम

या यंत्रणेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अ‍ॅलर्ट सिस्टमचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे संशयास्पद हालचाली किंवा अनधिकृत प्रवेश यांसारख्या घटनांना लगेच ओळखून अधिकाऱ्यांना सतर्क करता येईल. कमी प्रकाशातही हे कॅमेरे स्पष्ट फुटेज देऊ शकतील.

दररोज 13,000 हून अधिक गाड्या चालवणाऱ्या आणि सुमारे 2.4 कोटी प्रवाशांचा भार वाहणाऱ्या भारतीय रेल्वेसाठी ही यंत्रणा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासदायक ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!