अहिल्यानगर- केडगावमधील प्रभाग क्रमांक १६ मधील पाणीटंचाईचा प्रश्न उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही बिकट बनलेला असताना तातडीने नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे सुजय मोहिते यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला व प्रशासनाला सहकार्य केले. परंतु आता पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असताना देखील सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

भूषणनगर, शिवाजी नगर, वैष्णव नगर, शाहुनगर, अंबिका नगर, मराठा नगर आदी भागात पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, नागरिकांचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सुजय मोहिते यांनी केली आहे.