India’s Longest Bridge : देशात आत्तापर्यंत अनेक मोठमोठे रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राज्यातही गेल्या काही वर्षांच्या काळात अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का? आता केंद्र सरकारकडून देशातील सर्वाधिक लांबीचा पूल तयार केला जातोय. खरेतर भारतात हजारो पूल, उड्डाणपूल आहेत. अलीकडेच समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा पूल विकसित झालाय.

शिवडी ते न्हावा शेवा अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा पूल. पण आता यापेक्षाही लांब पूल तयार केला जातोय. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा पुल राहणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर याचे काम सुरू आहे.
हा पूल ढुबरी – फुलबारी दरम्यान तयार केला जातोय. याची लांबी 19 किलोमीटर राहील. यामुळे दोन राज्य एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत. या प्रकल्पामुळे मेघालय आणि आसाम आणखी जवळ येतील.
दोन्ही राज्यांमधील एकात्मिक विकासाला चालना मिळेल. कामाची सध्याची स्थिती आणि गती पाहता या प्रकल्पाचे काम सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. हा एक सहा पदरी पूल आहे.
या मार्गामुळे आसाम आणि मेघालयचा पश्चिम बंगाल सोबत थेट संपर्क तयार होणार आहे. यामुळे विदेशातील प्रवास देखील सोयीचा होणार आहे. भूतान आणि बांगलादेश मध्ये जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास कालावधी यामुळे कमी होणार आहे.
रस्ते मार्गाने भूतान आणि बांगलादेश ला जाणाऱ्यांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासादायी ठरणार आहे. या ब्रह्मपुत्रा नदीवर तयार होणाऱ्या पुलामुळे दोन राज्यांमधील प्रवास 25 मिनिटांवर येणार आहे.