Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या रिटायरमेंटच्या नियमांमध्ये नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारा गोंधळ यामुळे आता निकाली निघणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीविषयी असलेला दीर्घकालीन संभ्रम आता दूर झाला अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत. खरेतर, केंद्र सरकारने केंद्रीय सिव्हिल सेवा नियम 2021 (Central Civil Services Rules, 2021) अंतर्गत स्पष्ट केले आहे की, कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचा, राजीनाम्याचा किंवा मृत्यूचा दिवस हा त्याच्या सेवाकाळातील शेवटचा दिवस मानला जाईल.

दरम्यान, याच नियमाला धरून एक महत्त्वाचे निवेदन जारी करण्यात आले आहे. केंद्रातील सरकारकडून हे निवेदन जारी करण्यात आले आहे. सदर निवेदनानुसार कर्मचारी पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (Department of Pension & Pensioners’ Welfare) कर्मचाऱ्याच्या सेवेतून निवृत्ती,
सेवेतून काढून टाकणे, स्वेच्छा निवृत्ती किंवा मृत्यू झाल्यास तो संबंधित दिवस त्यांच्या सेवाकाळातील अंतिम दिवस म्हणून गणला जाईल. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीच्या गणनेवर होणार आहे.
यापूर्वी अनेकदा कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत संभ्रम होता की, निवृत्ती किंवा मृत्यू झालेला दिवस सेवेत धरला जाईल का. आता सरकारने स्पष्ट केले आहे की, तो दिवस सेवेत गणला जाईल आणि त्यामुळे त्याचाही विचार पेन्शन गणनेत केला जाईल.
दरम्यान, जर एखादा कर्मचारी निवृत्ती किंवा मृत्यूपूर्वी रजेवर असेल किंवा निलंबित अवस्थेत असेल, तर त्या कालावधीचा स्वतंत्र विचार केला जाईल. म्हणजेच, रजा किंवा निलंबनाचा कालावधी हा स्वतंत्रपणे सेवाकाळाचा भाग मानला जाईल आणि त्याचा हिशेब तदनुसार होईल.
सरकारच्या या निर्णयामुळे पेन्शन गणनेतील पारदर्शकता वाढणार असून, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रक्रियेतील गोंधळ दूर होणार आहे. यामुळे अनेक विभागांमधील प्रशासनिक कामकाज सुलभ होईल.
केंद्रीय सेवा नियमांतील या स्पष्टतेमुळे आता देशातील सर्व केंद्र सरकार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवानिवृत्तीशी संबंधित बाबींमध्ये अधिक स्पष्टता आणि निश्चितता मिळेल.













