प्रधानमंत्री आवास योजनेत बदल; काही लोकांना आता लाभ मिळणार नाही

Published on -

Pm Awas Yojana : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत, ज्याचा थेट परिणाम घरकुलासाठी अर्ज केलेल्या तसेच आगामी काळात अर्ज करण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, या बदलांचा मुख्य उद्देश योजनेचा खरा फायदा गरजू घटकांपर्यंत पोहोचवणे आणि गैरवापराला आळा बसवणे आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२४ नंतर जमीन खरेदी केलेल्या किंवा नोंदणी केलेल्या नागरिकांनी या नव्या नियमांची माहिती घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.

नवीन निर्णयानुसार, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० मधील लाभार्थी-नेतृत्वाखालील बांधकाम (BLC) घटकांतर्गत फक्त त्यांनाच पात्रता मिळेल, ज्यांच्याकडे ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी स्वतःची जमीन होती.

या तारखे नंतर जमीन खरेदी करणारे किंवा आपल्या नावावर नोंदणी करणारे अर्जदार घर बांधण्यासाठी दिल्या जाणाऱ्या २.५ लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्यास पात्र राहणार नाहीत. सरकारने असे बदल केल्याचे मुख्य कारण म्हणजे काही लोक फक्त योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जमीन खरेदी करत असल्याचे आढळले.

BLC श्रेणीत पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी केंद्र सरकारकडून १.५ लाख रुपये तर राज्य सरकारकडून १ लाख रुपये असे एकूण २.५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेत ३० ते ४५ चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर बांधण्याची मुभा आहे.

परंतु, लाभ मिळवण्यासाठी जमीन निवासी क्षेत्रात असणे अनिवार्य आहे; औद्योगिक, शेती किंवा इतर अनिवासी क्षेत्रातील जमिनीवर योजनेचा लाभ मिळणार नाही.

निधी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आता वैध जमीन प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून प्रत्यक्ष पाहणी आणि पडताळणी करून प्रमाणपत्र मिळवावे लागेल.

तसेच अर्जदारांनी जुने वीज किंवा पाणी बिल, ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वीची नगरपालिका मालमत्ता कराची पावती व जुन्या मतदार यादीतील नाव यासारखी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

सरकारच्या मते, या बदलांमुळे शहरी भागातील खरे गरजू, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सुरक्षित व परवडणारे घर उपलब्ध होईल. अर्जदारांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकेल.

या नवीन नियमांमुळे योजनेचा गैरवापर कमी होईल आणि खऱ्या गरजूंच्या जीवनात घरकुलाच्या स्वप्नाची पूर्तता होण्यास मदत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe