अहिल्यानगर- कृषी विस्तार कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे योजना राबविण्यात येत आहे. नगर जिल्ह्याकरिता महिला १, केंद्र/राज्य कृषी पुरस्कार प्राप्त / पीक स्पर्धा विजेते शेतकरी १, इतर शेतकरी ३ अशा एकूण ५ शेतकऱ्यांचा देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी संधी मिळणार आहे.
दौऱ्याकरिता पात्र असलेल्या इच्छुक शेतकऱ्यांनी प्रस्ताव ३० जुलै २०२५ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.

शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यसोबत घ्यावयाचे असेल, तर सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी, असे आवाहन केले आहे.
हे आहेत प्रमुख निकष
अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा (मागील सहा महिन्यातील ७/१२ व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र २). शेतकऱ्याचे अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.