अहिल्यानगर- जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश मिळवलेल्या चार युवा खेळाडूंचा गौरव समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या जिल्ह्याच्या भूमीपुत्रांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी मिळवलेले यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवणारे असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

धनश्री हनुमंत फंड हिने २० वर्षांखालील एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप, बर्लिन २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिची निवड आता बल्गेरियामधील वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने महिला कुस्ती क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.
सुजय नागनाथ तनपुरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बीच रेसलिंग स्पर्धेत ७० किलो वजनगटात सुवर्णपदक मिळवले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची निवड ग्रीसमधील जागतिक स्पर्धेसाठी झाली आहे. त्याचा प्रवास स्थानिक स्तरावरून आंतरराष्ट्रीय मंचापर्यंत पोहोचण्याचा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रणिता सोमण हिने चीनमध्ये पार पडलेल्या एम.टी.बी. एशियन चॅम्पियनशिप मिक्स टीम रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ती सध्या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कसून तयारी करत असून, सायकलिंग क्षेत्रात भारताचे नाव उज्वल करण्यासाठी सज्ज आहे.
वेदांत नितीन वाघमारे याने पेरूमध्ये पार पडलेल्या ज्युनियर वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याची निवड कझाकिस्तानमध्ये होणाऱ्या एशियन शुटिंग चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. वेदांतने अचूकतेचा आणि संयमाचा उत्तम नमुना सादर करून देशाची शान वाढवली आहे.
या चारही खेळाडूंनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून, भविष्यात ते ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये भारतासाठी अधिक पदके घेऊन येतील, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याची क्रीडा परंपरा पुढे नेण्यासाठी अशा खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी प्रशासन व सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.