अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावरील इमानपूर घाट निसर्गसौंदर्याने नटलेला हा घाट प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. मात्र सध्या या घाटातील काही ठिकाणी रस्त्यालगत मेलेली जनावरे टाकली जात असल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. पावसाळ्यामुळे ही स्थिती अधिकच बिकट झाली असून, घाटातून जाणाऱ्या प्रवाशांना नाकावर रुमाल धरून जावे लागत आहे.
सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच घाटातून नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराची सुमारे सात ते आठ हजार वारकऱ्यांची दिंडी तसेच अनेक इतर दिंड्या पायी जात आहेत. मात्र घाटात पसरलेल्या दुर्गंधीमुळे या श्रद्धेच्या यात्रेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वारकऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी इतका घाण वास येतो की चालणेही कठीण होते. काही ठिकाणी मृत म्हशी व अन्य जनावरांचे शव रस्त्यालगत टाकलेले दिसून येत असून, त्याभोवती कुजलेले कचरा आणि चिखल साचलेला आहे. घाटात थांबून विश्रांती घेण्याचा विचारही या दुर्गंधीमुळे शक्य होत नाही.
या गंभीर प्रकाराविरोधात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी समस्या स्पष्टपणे दिसून येत आहे. घाट परिसरात जाणाऱ्या प्रवाशांनी आणि भाविकांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
स्वच्छता ही केवळ सौंदर्य नसून सार्वजनिक आरोग्याचे रक्षणही आहे. हजारो वारकऱ्यांच्या पवित्र वारीमध्ये असा त्रास होणे अत्यंत खेदजनक आहे.
घाटातील जनावरांचे मृतदेह त्वरित हटवावेत, परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, घाटमार्गावर पर्यावरण पूरक आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करावे अशी मागणी होत आहे. या पवित्र वारीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये, घाटाचा निसर्गसौंदर्य जपले जावे, आणि स्वच्छतेमुळे प्रवाशांचा आणि भाविकांचा अनुभव अधिक सुखद व्हावा, हीच अपेक्षा आहे