स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कर्मचाऱ्यांना पात्रता पाहूनच संधी, शिफारस पत्र आणले तरी मुलाखत घेऊनच नियुक्ती होणार- पोलिस अधिक्षक

Published on -

अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सध्या अवघे चार कर्मचारी कार्यरत आहेत. बाकी सर्व संलग्न म्हणजेच पाहुणे कर्मचारी आहेत. २०१९ नंतर एलसीबीमध्ये कोणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. संलग्न कर्मचारी ठेवून कामकाज सुरू होते.

त्यामुळे आता एलसीबीमध्ये कर्मचाऱ्यांना थेट नियुक्त्या देण्यात येणार आहेत. मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांना एलसीबी संधी दिली जाणार नाही. जुन्या-नव्यांची पात्रता पाहून एलसीबीत कर्मचाऱ्यांना संधी दिली जाईल, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, एलसीबीमध्ये नियुक्ती मिळावी यासाठी अनेक लोकप्रतिनिधींकडून सुद्धा कर्मचाऱ्यांनी शिफारस पत्र आणले आहे. मात्र, त्या शिफारस पत्राचा यथायोग्य विचार करून त्या कर्मचाऱ्याची सर्वांगीण मुलाखतच घेऊनच एलसीबीत नियुक्ती देण्यात येईल. कर्मचाऱ्यांला त्याच्या क्षमतेनुसार काम दिले जाईल. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेची संलग्न आहेत. त्यांचे डिटेक्शन ही चांगले आहे, अशा कर्मचाऱ्यांना डिटेक्शनचेच काम दिले जाईल.

कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डिटेक्शनचे काम आहे. अशा कर्मचाऱ्यांची त्या पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात येईल.

तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्यांना सायबरमध्ये संधी

सायबर पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी कमी असल्याबाबत पत्रकारांनी विचारले एसपी घार्गे म्हणाले, सायबर पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी कमी आहेत ही बाब खरी आहे. नव्याने सायबर पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी देण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व पोलीस दलांमधून अर्ज मागविण्यात आले होते.

सुमारे १०० अर्ज आले होते. सायबर मध्ये काम करण्याची इच्छा आहे पण सायबरचे ज्ञान नसल्याचे अनेकांनी सांगितले. सोशल मिडीया, माहिती व तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्या सात ते आठ कर्मचाऱ्यांना लवकरच सायबर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात येईल, असे एसपी घार्गे यांनी सांगितले.

विशेष पथक होणार खालसा

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विशेष पथक स्थापन करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाया सुरू केल्या. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश मिळाले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोणतेही विशेष पथक कायमस्वरूपी नसते. त्यामुळे विशेष पथक आता बरखास्त करण्यात येईल आणि स्थानिक गुन्हे शाखा ही सक्रिय राहून काम करेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!